नागरिकांना मिळणार दिलासा मात्र नियम पाळण्याची गरज : डेल्टा प्लसचा फैलाव रोखण्यासाठीही प्रयत्न सुरू
प्रतिनिधी /बेळगाव
सोमवार दि. 5 जुलैपासून रात्री 9 पर्यंत सर्व व्यवहार सुरू ठेवण्यास सरकारने मुभा दिली आहे. काही मंदिरेही देवदर्शनासाठी खुली होणार असली तरी सिनेमा थिएटर, शाळा-कॉलेज अद्याप बंदच राहणार आहेत. अनलॉक-3.0 मुळे जनतेला दिलासा मिळणार असला तरी प्रत्येकाला नियम पाळावे लागणार आहेत.
जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी यासंबंधी एक आदेश जारी केला आहे. 5 जुलैच्या सकाळी 6 पासून 19 जुलैच्या सकाळी 6 पर्यंत हा आदेश अंमलात असणार आहे. सर्व व्यवहार सुरू ठेवण्यास वेळ वाढवून देण्यात आली असली तरी कोरोना महामारी व डेल्टा प्लसचा धोका ओळखून प्रत्येकाला खबरदारी घ्यावी लागणार आहे.
खासकरून महाराष्ट्र व केरळमधून कर्नाटकात प्रवेश करणाऱयांवर लक्ष ठेवण्याची सूचना जिल्हाधिकाऱयांनी केली आहे. सरकारच्या आदेशानुसार ही सूचना करण्यात आली आहे. महाराष्ट्रात डेल्टा प्लसचा फैलाव वाढत आहे. म्हणून सीमाभागात त्याचा फैलाव रोखण्यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे.
महाराष्ट्र व केरळमध्ये रुग्णसंख्या वाढल्यानंतर तीन आठवडय़ांनी कर्नाटकातही पुन्हा रुग्णसंख्या वाढणार असून ती तिसरी लाट असणार आहे, असा इशारा तज्ञांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर सर्व व्यवहार सुरू ठेवण्यास रात्री 9 पर्यंत मुभा असली तरी नागरिकांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर आणि सामाजिक अंतराचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
चित्रपटगृहे मात्र बंदच
सोमवारपासून बार, हॉटेल उघडणार आहेत. पूर्वी केवळ पार्सल सेवांना अनुमती होती. आता हॉटेलमध्ये बसून खायला परवानगी असणार आहे. ऑटोरिक्षा, टॅक्सी, मंदिरे, मशीद, चर्च, सराफी पेढी, बार अँड रेस्टॉरंट, हॉटेल उघडण्यास अनलॉक-3.0 मध्ये परवानगी देण्यात आली आहे. चित्रपटगृहे मात्र अद्याप बंद असणार आहेत.