प्रतिनिधी / पणजी
आज बुधवारपासून राज्यात दि. 29 पर्यंत दररोज पावसाची शक्यता पणजी वेधशाळेने व्यक्त केली आहे. बंगालच्या महासागरात तयार झालेल्या ‘यास’ या चक्रिवादळाचा फार मोठा फरक अद्याप गोव्यावर पडलेला नाही. मात्र सुमद्र खवळलेला आहे आणि राज्यात सर्वत्र जोरदार वारे वहात आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज आणि उद्या असे दोन दिवस विजांचा जोरदार गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दि. 29 पर्यंत राज्यात सर्वत्र मध्यम प्रमाणात पाऊस पडेल. ‘यास’ चक्रीवादळ आजच बंगालला धडक देणार आहे.
राज्यातील मच्छीमारी दि. 31 मे पर्यंत चालणार असली तरी यास वादळाने गेले दोन दिवस समुद्र खवळलेला असल्यामुळे व पुढील 4 दिवस समुद्र खवळलेला रहाणर असल्याने मच्छीमारांनी जवळपास मासेमारी बंदच करुन टाकली आहे. यंदा मच्छीमाऱयांना चक्रिवादळाचा बराच मोठा फटका बसलेला आहे. सध्या सर्व मच्छीमारांनी आपले ट्रॉलर्स धक्क्यावर आणून लावलेले आहेत.