वार्ताहर/किणे
आजरा तालुक्यातील वाटंगीपैकी मोरेवाडी धनगरवाडा येथे गेल्या आठ दिवसात 4 म्हैशींचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. या दोन्ही वाड्यावस्तीमध्ये एकूण 30 जनावरे बाधीत असून जिल्हा परिषद पशुवैद्यकीय विभाग व गोकूळ संघाचे पशू वैद्यकीय विभागाच्या दोन्ही टिमने बाधीत जनावरांवर उपचार सुरू केले आहेत. तर सध्या 150 जनावरांना घटसर्फ प्रतिबंधक लसीकरण केले आहे. मृत म्हैशींचे पंचनामे केले असून नमुना तपासणीसाठी लिव्हर चे व रक्ताचे नमुने पूणे येथे पाठविण्यात आले आहेत.
मोरेवाडी येथील मसणाबाई गावडे, विलास पोवार, भिमराव वांद्रे, तर धनगरवाड्यावरील धावू आडूळकर यांच्या म्हैशी दगावल्या. सध्या लॉकडाऊनमुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसमोर उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या दुभत्या जनावरांच्या मृत्यू मुळे मोठे संकट कोसळलं असून गोकूळ संघाने या शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करावे अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.