प्रतिनिधी/ रत्नागिरी
गेले तीन दिवसांपासून अवकाळी पावसाने जिल्हावासीय हैराण झाले आहेत. ऐन हिवाळ्यात जिह्यात ठिकठिकाणी कमी, मध्यम व मोठय़ा स्वरूपाचा पाऊस बरसला. निसर्गाच्या या बदललेल्या चक्रात येथील आंबा व काजूसह उन्हाळी पिकांचे नुकसान झाले आहे. शनिवार, 9 रोजी काही भागात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
ढगाळ वातावरणाने जिह्यातील थंडी गायब आहे. या वातावरणामुळे आंबा व काजूच्या मोहरावर करपा रोगाचा प्रादुर्भाव व त्याचा परिणाम फळधारणेवर होणार आहे. शुक्रवारी पहाटेपासून रत्नागिरीत अनेक भागात पावसाची रिपरिप सुरू होती. दिवसभर वातावरण ढगाळ होते.
राजापुरात जोरदार पाऊस
राजापूर तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी जवळपास तासभर जोरदार पाऊस कोसळला. गुरुवारी रात्री जैतापूर, केळवली पट्टय़ात पावसाचा शिडकावा झाला. शुक्रवारी सकाळपासूनच पावसाने पुन्हा सुरूवात केली. सायंकाळी 5 च्या सुमारास मुसळधार पावसाला सुरूवात झाली. या पावसामुळे सर्वांचीच धावपळ उडाली.
चिपळुणात थंडी गायब
चिपळूण तालुक्यात विविध भागात शुक्रवारी सकाळी जोरदार पाऊस झाला. पावसानंतर दिवसभर ढगाळ वातावरण असून यामुळे थंडी गायब झाली आहे. चिपळूण शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी या पावसाने हजेरी लावली.
गुहागरात बागायतदार हवालदिल
गुहागर तालुक्यात बुधवारी सुमारे एक तास पडलेल्या जोरदार पावसाने आंबा, काजू, सुपारी पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतरही गेले दोन दिवस पडणाऱया पावसाने तालुक्यातील शेतकरी, बागायतदार हवालदिल झाले आहेत. ढगाळ वातावरण व अवकाळी पावसामुळे आंबा, काजू कलमांचा मोहर गळून गेला आहे. झाडांवर केलेली फवारणीही वाया गेली आहे.
दापोलीत आंबा, कलिंगड, काजूचे नुकसान
zदापोली तालुक्यातील काही भागात तुरळक तर केळशी परिसरात मुसळधार पावसामुळे आंबा, काजू बागायतदार व कलिंगड, भाजीपाला करणाऱया शेतकऱयांचे मोठे नुकसान झाले आहे. जूनमध्ये झालेल्या निसर्ग चक्रीवादळातून सावरण्याआधीच पुन्हा निसर्गाची अवकृपा झाल्याने संकट पाठ सोडत नाही, अशी परिस्थिती दापोलीकरांची झाली आहे.
कृषी विद्यापीठाचा शेतकऱयांना सल्ला
अवकाळी पावसामुळे आंबा पिकावर कीड व रोग प्रादुर्भावाची शक्यता डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडून वर्तवण्यात आली आहे. पावसानंतर वातावरण ढगाळ राहिल्यास पालवी, मोहोर व फळांवर तुडतुडय़ांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. यावर उपाय म्हणून इमिडाक्लोप्रिड 17.8 टक्के प्रवाही 3 मिली किंवा थायोमेथॉक्झम 25 टक्के 1 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी घेऊन फवारणी करावी. आंबा बागायतदारांनी फुलकिडे, मिजमाशी व शेंडा पोखरणारी अळींच्या प्रादुर्भावाकडेही लक्ष ठेवावे. पाऊस झालेल्या आंबा बागांमध्ये आर्द्रता वाढल्यास व तापमानात घट झाल्यास भुरी व करपा रोगांचा प्रार्दुभाव होण्याची शक्यता आहे. भुरी नियंत्रणासाठी 5 टक्के हेक्झाकानॅझोल 5 मि.ली. किंवा पाण्यात विरघळणारे 80 टक्के गंधक 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वापरावे. करपा रोगाच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डॅझिम 12 टक्के, मॅन्कोझेब 63 टक्के हे संयुक्त बुरशीनाशक 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे, असे आवाहन विद्यापीठाच्यावतीने करण्यात आले आहे.