वृत्तसंस्था/ नवी दिल्ली :
कोव्हिड-19 मुळे अपवाद वगळले तर जवळपास प्रत्येकाला लॉकडाऊनमुळे दाहि दिशा पहाव्या लागल्या. अपवाद वगळता जवळपास प्रत्येकाची ससेहोलपट झाली. पण, काही तारे असेही समोर आले आहेत, ज्यांनी जणू निखाऱयातून चालण्यासदृश परिस्थिती असताना त्यातूनही मार्ग काढला. बिहारची 15 वर्षीय ज्योती कुमारी ही त्यापैकीच एक. वडील आजारी असल्याने आणि अन्य कोणताही पर्याय नसल्याने ज्योतीने सायकल बाहेर काढली आणि कॅरियरवर वडिलांना बसवून थोडेथोडके नव्हे तर चक्क 1200 किलोमीटर्सचे अंतर सायकलवरुन कापून काढले. याचीच दखल घेत भारतीय सायकलिंग फेडरेशनने या कन्येला चाचणीसाठी निमंत्रण दिले आहे.
राष्ट्रव्यापी लॉकडाऊन सुरु झाले, त्यावेळी ज्योती व तिचे वडील गुरुग्राममध्ये अडकले आणि तेथून बिहारमधील दरभंगा हे त्यांचे गाव चक्क 1200 किलोमीटर्सवर होते. पण, ज्योतीची जिद्द इथूनच सुरु झाली. तिने आजारी वडिलांना कॅरियरवर बसवले आणि 1200 किलोमीटर्सचे अंतर 7 दिवसात पार करत घर गाठले.
ज्योतीच्या या जिद्दी कहाणीची माहिती मिळाल्यानंतर भारतीय सायकलिंग फेडरेशनचे अध्यक्ष ओंकार सिंग यांनी तिला चाचणीसाठी निमंत्रण पाठवले असल्याचे जाहीर केले. भारतीय क्रीडा प्राधिकरणाचा एक भाग असलेल्या आयजीआय स्टेडियममधील अत्याधुनिक नॅशनल सायकलिंग अकादमीला जागतिक सायकलिंग संघटनेची मान्यता आहे.
‘आम्ही आज सकाळीच ज्योती कुमारी या कन्येशी संपर्क साधला आणि लॉकडाऊन मागे घेतले गेल्यानंतर चाचणीसाठी दिल्लीला येण्याचे निमंत्रण तिला दिले. तिच्या प्रवासाचा, राहण्याचा व अन्य खर्च आम्ही करणार आहोत. जर तिला तिच्यासोबत आणखी कोणी हवे असेल तर त्यासाठीही आम्ही परवानगी दिली आहे. तो खर्चही आम्हीच करु. आम्ही आमच्या बिहार विभागाशी याबाबत संपर्कात असून तिला चाचणीसाठी दिल्लीत कसे आणायचे, याबद्दल विचार सुरु आहे’, असे भारतीय सायकलिंग फेडरेशनचे अध्यक्ष ओंकार सिंग म्हणाले.
‘आमच्या अकादमीत संगणकीय सायकल आहे आणि निवडीसाठी 7 ते 8 निकष असतात. ते ज्योतीने पार केले तर तिच्या प्रशिक्षणाची जबाबदारी आम्ही घेऊ. सरावासाठी किंवा अन्य कोणत्याही बाबीसाठी काहीही खर्च करावा लागणार नाही’, याचा त्यांनी उल्लेख केला.
‘आमची अकादमी नेहमी युवा गुणवत्तेच्या शोधात असते. आताही अकादमीत 14-15 वयोगटातील 10 सायकलिस्ट आहेत’, असे ते येथे म्हणाले. ज्योतीचे वडील मोहन पास्वान हे रिक्षा ड्रायव्हर असून त्यांना दुखापत झाली आहे. लॉकडाऊनमुळे उत्पन्नाचा मार्ग ठप्प झाला आणि मूळ मालकाकडे त्यांना रिक्षा परत करावी लागली. त्यानंतर जी काही रक्कम हाताशी होती, त्यातून सायकल खरेदी करत या पिता-कन्येचा प्रवास त्यावरुन सुरु झाला. पुढे, मजल-दरमजल प्रवास करत दि. 16 मे रोजी ते दोघेही आपल्या गावी दाखल झाले.