भारत पेट्रोलियमच्या सर्वच डेपोंवर शॉर्टेजचा परिणाम
प्रतिनिधी/ रत्नागिरी
राज्यात सध्या पेट्रोल-डिझेलचा तुटवडा जाणवू लागला आहे. विशेष करून भारत पेट्रोलियमच्या सर्व डेपोंवर हे शॉर्टेज आहे. कंपन्यांनी पेमेंट्सच्या टर्म अचानक बदलल्या आहेत, त्यात पैसे देऊनही भारत पेट्रोलियममध्ये माल मिळत नसल्याची माहिती फामपेडाचे (फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डीलर्स असोसिएशन) अध्यक्ष उदय लोध यांनी दिली.
या बाबत बोलताना लोध यांनी सांगितलं की, सध्या अचानक इंधनाचा तुटवडा ऑईल कंपन्यांकडून चालू झाला आहे. यात प्रामुख्याने भारत पेट्रोलियमने गेले 2 दिवस जवळपास सर्वच डेपोंमध्ये इंधन पुरवठा बंद केला आहे. कोणतीही कारणं देताहेत. ही कारणं लॉजिकल वाटत नाहीयेत आणि डीलरला सप्लाय नाकारला जातोय. इतर दोन कंपन्या आणि भारत पेट्रोलियमनेही अचानक पेमेंट्सच्या टर्म बदलल्या, पूर्वी सकाळी माल दिला तर संध्याकाळपर्यंत पैसे देऊन चालायचे, पण त्याचदिवशी पेमेंट व्हायचं. आता हे आदल्या दिवशी ऍडव्हान्स पैसे मागताहेत, त्यामुळे पैशाची रोटेशेनची साखळी बिघडली आहे. ऍडव्हान्स पैसे द्यायला शक्य होत नाही आहे. मात्र पैसे देऊनही भारत पेट्रोलियममध्ये माल मिळत नाही, अशी परिस्थिती गेले 2 दिवस आहे. त्यामुळे शनिवार व रविवारी हा तुटवडा जास्त जाणवण्याची शक्यता असल्याची माहिती लोध यांनी यावेळी दिली.
कंपन्या म्हणताहेत…डिझेल विक्रीत तोटा होतोय
राज्यात ऑईल कंपन्यांकडून अचानक इंधनाचा तुटवडा जाणवत आहे. तसेच ऑईल कंपन्या असं म्हणतात की, आम्हांला या दरामध्ये डिझेल विकायला तोटा होतोय. त्यामुळे विक्री तोटय़ात येत असेल तर आम्ही विकायचे कसे, असं कंपन्यांचे म्हणणं असल्याचे ऐकिवात आहे.
–उदय लोध, अध्यक्ष फामपेडा