चिपळुणातील बैठकीत भास्कर जाधवांची सरपंचांना ग्वाही
प्रतिनिधी/ चिपळूण
आज कोरोना आणि गावचे प्रश्न समजावून घेतले आहेत. पुढच्या बैठकीत विकासाचे प्रश्न सोडवूया, तालुक्याच्या विकासासाठी शंभर टक्के प्रयत्न करू, अशी ग्वाही आमदार भास्कर जाधव यांनी बुधवारी तालुक्यातील सरपंचांना दिली. आमदार जाधव यांनी प्रथमच घेतलेली आढावा बैठक आणि चिपळूणच्या विकासात टाकलेले लक्ष यामुळे येथील राजकारणात चुळबूळ सुरू झाली आहे.
चिपळूण तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष रूपेश घाग यांनी घेतलेल्या पुढाकारातून येथील पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात तालुक्यातील सरपंच तसेच अधिकारीवर्ग यांची बैठक झाली. यावेळी सरपंच रूपेश घाग यांच्यासह किशोर घाग, अजय महाडिक, सचिन शेटय़े, किशोर कदम, चंदन भोबस्कर आदी सरपंचांनी कोरोनासंदर्भात आलेले चाकरमानी, त्यांची व्यवस्था करताना येत असलेल्या अडचणी आणि तालुक्यातील विकासासंदर्भात आपली कैफियत मांडली.
आमदार जाधव यावेळी म्हणाले की, मुळातच एखादा प्रश्न वा मागणी केवळ पत्र पाठवून पूर्ण होत नसते. त्यासाठी अभ्यासपूर्ण पाठपुरावा लागतो. मात्र सध्या प्रत्येक गोष्टीत पत्रांचा खेळ चालला असल्याचा टोला त्यांनी पत्रके काढणाऱयांना लगावला. महामार्ग चौपदरीकरण पुलांचा शुभारंभ 2014मध्ये झाला. परशुराम ते आरवली टप्प्याचे काम करणाऱया कंपनीकडून अपेक्षित काम झालेले नाही. गेल्या हंगामात अवघे सव्वासहा टक्के काम झाले आहे. या कंपनीकडून काम होऊ शकत नसल्याचे दिसून आल्याने आपण या कंपनीला ‘टर्मिनेट’ करावे अशी मागणी केली आहे. त्यावर कार्यवाहीही सुरू झाली आहे. वाशिष्ठी पूल कामाबाबत डिसेंबरपर्यंत कार्यवाही न झाल्यास सर्वांच्या मदतीने मोठे जनआंदोलन उभारू असेही त्यांनी सांगितले.
जिल्हय़ात गाजत असलेल्या जनसुविधेच्या रद्द कामांबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, कामे मंजूर असली तरी किती खोटी आणि किती खरी हे मला माहित नाही. पालकमंत्र्यांनी मंजूर केलेली कामे दुसरा मंत्री रद्द करू शकत नाही. किंबहुना प्रशासनाने तरी त्याची दखल घ्यायला हवी. मात्र झालेल्या कामांचे पैसे आपण मिळवून देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले. गुहागरबरोबरच चिपळूण तालुक्यातील 20 हजार कुटुंबांना अर्सेनिक अल्बमच्या गोळय़ांचे वाटप करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी सभापती धनश्री शिंदे, उपसभापती पांडुरंग माळी, प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार जयराज सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ, गटविकास अधिकारी सरिता पवार, जिल्हा परिषद सदस्य विक्रांत जाधव, माजी सभापती पूजा निकम, प्रताप शिंदे आदी उपस्थित होते.
गटविकास अधिकारी निरूत्तर
या बैठकीत आमदार जाधव यांनी आपली जुनी ‘स्टाईल’ वापरत अधिकाऱयांसमोर प्रश्न उपस्थित केले. कौंढरताम्हाने ग्रामपंचायत कार्यालयाची पंधरा दिवसांपूर्वीच्या वादळात कौले उडून गेली. यासंदर्भात आमदार जाधव यांनी गटविकास अधिकारी पवार यांना वस्तूस्थिती मांडण्यास सांगितली. आपण पहाणी केलीत का? तालुक्यात कुठे दौरा केलात? या प्रश्नावर पवार यांनी पिंपळी भागात दौरा केला, असे सांगताच ‘खूप लांबचा दौरा केलात’ असे म्हणत तालुक्यात फिरा, पहाणी करा अशा शब्दात आमदारांनी त्यांना सुनावले.