पश्चिम बंगाल, आसाममध्ये दुसऱया टप्प्यातील मतदान
कोलकाता, गुवाहाटी / वृत्तसंस्था
पश्चिम बंगालच्या 30 तर आसामच्या 39 मतदारसंघांमध्ये गुरुवारी मतदान होत आहे. दुसऱया टप्प्यातील 69 जागांसाठी निवडणुकीची तयारी पूर्ण झाली असून नंदिग्राम मतदारसंघातील निवडणुकीकडे साऱया देशाचे लक्ष लागून राहिले आहे. तेथे सुवेंदू अधिकारी आणि ममता बॅनर्जी यांच्यात येथे थेट लढत आहे. आज सकाळी मतदानाला सुरूवात झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये सकाळी अकरा वाजेपर्य़ंत 24.37 टक्के तर आसामध्ये 18.40 टक्के मतदान झाले आहे.
चुरशीने लढविल्या जात असलेल्या पश्चिम बंगाल आणि आसामच्या विधानसभा निवडणुकांमधील मतदाराच्या दुसऱया टप्प्याचा प्रचार मंगळवारी समाप्त झाला आहे. आसाममधील मतदानाच्या दुसऱया टप्प्यातील अनेक मतदारसंघांमध्ये बंगाली हिंदूंची संख्या मोठी आहे. त्यांच्यापैकी अनेकजण बांगला देशातून आले आहेत. त्यांच्या दृष्टीने नागरिकत्वाचा मुद्दा सर्वाधिक महत्वाचा मानला गेला आहे. त्यामुळे या टप्प्यातील मतदान निर्णायक ठरू शकते. पश्चिम बंगालमध्ये दुसऱया टप्यात पूर्वेकडील आणि मध्य भागातील 30 मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. बव्हंशी मतदारसंघांमध्ये भाजप आणि तृणमूलमध्येच लढत असली तरी डावे-काँगेस आघाडीनेही येथे निवडणूक प्रतिष्ठेची बनवली आहे. या टप्प्यातील सर्व मतदारसंघांमध्ये पश्चिम बंगालमधील नंदिग्रामकडे देशाचे लक्ष खिळून राहिले आहे. येथे तृणमूल काँगेसमधून भाजपमध्ये आलेले सुवेंदू अधिकारी आणि ममता बॅनर्जी अशी लढत होत असून त्यात कोणाचे पारडे जड ठरणार हे आजतरी निश्चित सांगता येणे कठीण आहे. ममता बॅनर्जी आपला नेहमीचा भवानीपूर मतदारसंघ सोडून नंदिग्राम येथे आल्या आहेत. त्यांचा पराभव करण्याची महत्वाकांक्षा सुवेंदू अधिकारी या एकेकाळी त्यांचाच उजवा हात मानल्या गेलेल्या सुवेंदू अधिकारी यांनी बाळगली आहे. त्यामुळे नंदिग्राम आकर्षणाचे केंद्र आहे.