सामूहिक संसर्गाचा धोका ओळखून नागरिकांनीच काळजी घेणे महत्त्वाचे
प्रतिनिधी/ बेळगाव
रविवार दि. 2 ऑगस्टपासून म्हणजेच आजपासून सरकारने अनलॉक 3 मार्गसूची जाहीर केली आहे. या अंतर्गत आता रविवारी सर्व व्यवहार सुरळीत राहणार आहेत. कित्येक दिवसांनंतर रविवारी बेळगावमध्ये व्यवहार सुरू राहतील, बससेवा सुरू राहील, हे अत्यंत स्वागतार्ह आहे. मात्र तितकीच बेळगावकरांची जबाबदारी वाढली आहे.
कोरोना पूर्णत: नियंत्रणात आलेला नाही. उलटपक्षी सातत्याने कोरोनाबाधितांची संख्या वाढते आहे. सामूहिक संसर्ग झाल्याची अधिकृत घोषणा प्रशासन किंवा सरकार करत नसले तरी सामूहिक संसर्ग सुरू झाल्याचे प्रत्येकालाच माहीत आहे. अशावेळी काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे.
घरात अडकून पडलेल्या प्रत्येकालाच आपण कधी बाहेर पडू असे झाले आहे. त्यामुळे लॉकडाऊन उठवल्यानंतर बाजारपेठेत कमालीची गर्दी झाली. या गर्दीतील असंख्य लोक मास्कशिवायच वावरताना दिसतात. शिवाय गर्दी झाली की सामाजिक अंतराचे भान पूर्णत: विस्मृतीत जाते. रविवारी नारळीपौर्णिमा आणि प्रेंडशिप डे असल्याने पुन्हा गर्दी होण्याची शक्मयता नाकारता येत नाही.
परंतु आता गल्लोगल्ली कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत आणि तो परिसर सील करण्यात येत आहे. गल्लीत रुग्ण आढळला की, त्या गल्लीसह परिसरातील नागरिक भयभीत होत आहेत. अनेकदा बाधितांच्या कुटुंबालासुद्धा बहिष्कृत असल्याप्रमाणे वागणूक दिली जाते. पीपीई कीट घालून आलेले आरोग्यसेवक, रुग्णवाहिका, परिसर सीलडाऊन करण्यासाठी आलेले पोलीस यांच्यामुळे भीतीमध्ये भर पडते. त्यामुळे या सर्व यंत्रणांनी परिसरात सील करताना लोकांमध्ये भय पसरणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे.
आज शहरातील बहुसंख्य भागामध्ये सीलडाऊन करण्याचे चित्र पहायला मिळते. टिळकवाडी, अनगोळ, चिदंबरनगर या भागांनाही सीलडाऊनला सामोरे जावे लागले आहे. चिदंबरनगर येथे तर ज्येष्ठ नागरिकांची संख्या अधिक आहे. येथील बहुसंख्य घरांमधील मुले परगावी किंवा परदेशात असून फक्त आई, वडील घरी राहतात, हे वास्तव आहे. या सर्वांनीच शक्मयतो बाहेर पडण्याचे टाळणे हितावह ठरणार आहे.
चौकट
सीलडाऊनचा कालावधी जाहीर करणे आवश्यक
सीलडाऊन किती कालावधीसाठी आहे, हे प्रशासनाने नमूद करून तो कालावधी संपल्यावर सीलडाऊन उठविणेही आवश्यक आहे. यामध्ये सुसूत्रता नसल्याने लोक स्वत:च बॅरिकेड्सच्या दोऱया उखडून टाकत आहेत. लोक काही काळापुरतीच सहनशीलता ठेवून सहकार्य करू शकतात. पुन्हा सीलडाऊन असलेल्या भागात बाजारपेठा, दुकाने सुरू राहतील का नाही, याबद्दलही कोणतेच स्पष्टीकरण प्रशासनाकडून मिळत नाही.
‘आपली सुरक्षितता आपल्या हाती’
एकूणच पोलीस, प्रशासन, आरोग्य खाते यांच्यातील समन्वयाचा फटका नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारावर आणि जीवनावर होतो आहे. या यंत्रणांमध्ये सुसूत्रता येईल, अशी अपेक्षा ठेवण्यास हरकत नाही. परंतु तोपर्यंत ‘आपली सुरक्षितता आपल्या हाती’ एवढे लक्षात ठेवून गरज नसताना बाहेर पडण्याचे टाळलेले बरे. त्याचबरोबर मास्क वापरणे आणि सामाजिक अंतर पाळणे हा आता नियम नाही तर ती सवय करून घेणे आवश्यक ठरेल.