प्रतिनिधी / सातारा :
तुटपुंजा पगार, तसेच कोरोना काळातील थकीत वेतन यामुळे राज्यभरात 37 एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. कोरोनाने 350 हून अधिक जणांचा बळी घेतला. त्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना शासनाकडून मदत मिळाली नाही. त्याकरता एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी सातारा विभागातील सर्वच आगारात दि.7 च्या मध्यरात्रीपासून संप पुकारत आहोत, असा इशारा एसटी कामगारांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना निवेदनाद्वारे दिला. पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी तुमच्या मागण्यांच्या अनुषंगाने शासनस्तरावर प्रश्न मांडून त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करु असे आश्वासन त्यांनी दिले.
पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना एसटी कामागारांनी संघटना विरहित कर्मचाऱ्यांच्या सह्यांचे निवेदन दिले असून यावेळी एसटी कामगारांचे शिष्टमंडळ उपस्थित होते. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, आम्ही राज्य परिवहन सातारा आगारातील सर्व कर्मचारी एस.टी. महामंडळास राज्य शासनामध्ये विलीकरण करण्यासाठी काम बंद आंदोलन करत आहोत. महाराष्ट्रातील सर्व एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनात सहभागी होत आहोत. कारण गेल्या एक वर्षापासून तीस पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी आर्थिक अडचणीमुळे व कर्जबाजारीपणास कंटाळून आत्महत्या केलेल्या आहेत. त्यामुळे त्यांचे संसार उध्वस्त झाले आहेत. एस.टी. कर्मचाऱ्यांना पगार अल्प प्रमाणात मिळत असल्यामुळे त्या पगारामध्ये कर्मचाऱ्यांना उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. कमी पगारामुळे कर्मचारी दिवसेंदिवस स्वतःचे जीवन संपवण्याचा निर्णय घेत आहेत. म्हणून एसटीचे राज्य शासनामध्ये विलिनीकरण व्हावे या प्रमुख मागणीसाठी आम्ही सातारा आगारातील सर्व कर्मचारी काम बंद आंदोलन सुरु करणार आहोत. हे आंदोलन दि. 7 रोजी मध्यरात्रीपासून सुरू होईल. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहिल, असा इशारा त्यांनी दिला आहे.