रत्नागिरी शहर भाजपाने न. प. सत्ताधाऱयांना ठणकावले
प्रतिनिधी/ रत्नागिरी
नगराध्यक्ष, रस्त्यावरील खड्डे कधी भरणार, असा सवाल उपस्थित करत रत्नागिरी शहर भाजपाचे कार्यकर्ते गुरूवारी थेट रस्त्यावर उतरले. येथील आठवडा बाजार परिसर, गांधी कॉलनी येथील रस्त्यांमध्ये पडलेल्या प्रचंड खड्डय़ांची दुरूस्ती न करणाऱया नगर परिषदेतील सत्ताधाऱयांविरोधात ओरड करत त्या खड्डय़ांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले.
शहरातील अनेक रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. भाजपाने नगर पालिका प्रशासनाचा जाहीर निषेध करत ‘रस्त्यावरील खड्डे भरा नाहीतर खुर्च्या खाली करा’, 8 दिवसांत सर्व रस्ते चकाचक करा, अशी जोरदार नारेबाजी करत कार्यकर्ते रस्त्यावर आले. अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा भाजपाचे शहराध्यक्ष सचिन करमरकर यांनी दिला. गेली काही वर्षे शहरातील रस्त्यांबाबत नागरिकांकडून तक्रारी येत आहेत. एकदा केलेल्या कामानंतर रस्त्यांवर पुन्हा डांबर टाकावे लागते. एकदा केलेला रस्ता किती वर्षे टिकला पाहिजे, या बाबतही नियम, निकष आहेत. परंतु सत्ताधाऱयांकडून रस्त्यांच्या कामाकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. आता तरी नगराध्यक्षांनी यात लक्ष घालून रस्ते चकाचक करावेत. ज्यांनी नगराध्यक्ष व सत्ताधाऱयांना निवडून दिले. त्या जनतेची कामे करावीत, असा टोला भाजयुमो जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांना लगावला. पालिकेच्या मुख्याधिकाऱयांना समस्यांबाबत पत्र पाठवले तरीही त्यांच्याकडून उत्तर दिले जात नाही. जनतेच्या रोषाला कारणीभूत होऊ नका, असा अशाही पटवर्धन यांनी दिला. केंद्र सरकारकडून रत्नागिरी नगर पालिकेला स्वच्छतेचे पारितोषिक मिळाले. परंतु शहरातील समस्या कायम आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शहर भाजपाच्यावतीने गुरूवारी सकाळी आठवडा बाजार येथील गांधी कॉलनीच्या रस्त्यावर वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर माळनाका येथील खराब झालेल्या रस्त्यावर सत्ताधाऱयांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी विनय उर्फ भैया मलुष्टे, संदीप सुर्वे, नगरसेवक राजेश तोडणकर, राजन पटवर्धन, राजश्री शिवलकर, नगरसेविका सुप्रिया रसाळ, राजन फाळके, संदीप रसाळ, भाजयुमो शहराध्यक्ष विक्रम जैन, माजी शहराध्यक्ष प्रशांत डिंगणकर, राजू भाटलेकर, नंदू चव्हाण, हर्ष दुडे, अशोक वाडेकर, प्राजक्ता रुमडे, रामा शेलटकर, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष ऐश्वर्या जठार, पमू पाटील, अमन काझी, बबलू शर्मा, वेदिका गवाणकर आदी उपस्थित होते. रत्नागिरी शहराच्या अनेक प्रभागांमध्ये अस्वच्छता दिसते. तसेच ठराविक प्रभागातच कामे केली जातात. शहरातील बहुतांशी रस्ते खड्डेमय, गाडी चालवण्याच्या उपयोगीचे राहिलेले नाहीत. त्यामुळे त्वरित खड्डे भरून डांबरीकरण करावे, अशी मागणी भाजपाच्यावतीने यावेळी करण्यात आली.