शेतकरी नेते रेल्वेमार्गावर उतरणार- रेल्वे विभागाने उचलली पावले
@ वृत्तसंस्था / नवी दिल्ली
नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात गुरुवारी देशभरात रेल्वेगाडय़ा रोखण्यात येणार असल्याचा दावा भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी बुधवारी दिली आहे. दुपारी 12 वाजल्यापासून सायंकाळी 4 वाजेपर्यंत देशभरात ‘रेल रोको’ आंदोलन होणार असल्याचे ते म्हणाले. देशव्यापी ‘चक्का जाम’मधून दिल्ली, उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडला वगळण्यात आले होते, पण रेल रोको आंदोलनात कुठल्याच राज्याला सूट देण्यात येणार नसल्याचे म्हटले गेले आहे. तर या पार्श्वभूमीवर रेल्वेनही रेल्वे सुरक्षा दलाच्या 20 अतिरिक्त तुकडय़ा तैनात केल्या आहेत.
केंद्र सरकार मागील 8 महिन्यांपासून अनेक रेल्वेगाडय़ा सुरू करण्याची अनुमती देत नाही. पण अनेक प्रकारची अन्य बंधने मात्र हटविण्यात आली आहेत. रेल्वेगाडय़ा बंद असल्याने लोकांना मोठा त्रास होत आहे. गुरुवारी होणाऱया रेल रोको आंदोलनात गावातील लोक मोठय़ा प्रमाणात सहभागी होतील असे राकेश टिकैत यांनी म्हटले आहे. संयुक्त किसान मोर्चाने मागील आठवडय़ात रेल रोको आंदोलनाची घोषणा केली होती.
रेल्वेचीही तयारी
शेतकरी संघटनांच्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर रेल्वेनेही विशेष तयारी केली आहे. देशभरात रेल्वे सुरक्षा दलाच्या 20 अतिरिक्त तुकडय़ा म्हणजेच सुमारे 20 हजार जवान तैनात करण्यात आले आहेत. पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश आणि पश्चिम बंगालवर मुख्य भर देण्यात आला आहे. शेतकऱयांनी प्रवाशांना त्रास होऊ देऊ नये, असे उद्गार रेल्वे सुरक्षा दलाचे महासंचालक अरुण कुमार यांनी काढले आहेत.
दबावतंत्राचा भाग
रेल रोको आंदोलनाचा निर्णय नाईलाजाने घ्यावा लागल्याचा दावा शेतकरी संघटनांनी केला आहे. सरकारवर कृषी कायदे मागे घेण्यासाठी दबाव आणण्याचा यामागे उद्देश आहे. सर्व रेल्वेमार्ग रोखू. पूर्ण आंदोलन योजनेनुरुप व्हावे हे पाहिले जाणार असल्याचे पंजाबच्या कीर्ति किसान युनियनचे सचिव जितेंदर सिंग शीना यांनी म्हटले आहे.