शेतकरीविरोधी कायद्याच्या निषेधार्थ शेतकरी आक्रमक
प्रतिनिधी/ बेळगाव
भू-सुधारणा विधेयक आणि एपीएमसी दुरुस्ती कायदा आदी शेतकरीविरोधी कायद्यांना विरोध करण्यासाठी शेतकऱयांनी सोमवार दि. 28 सप्टेंबर रोजी कर्नाटक बंदची हाक दिली आहे. बेळगाव येथील शेतकरी संघटनांच्या बंदला दलित व कन्नड संघटनांनी पाठिंबा दिला आहे.
केंद्र व राज्य सरकारने अवलंबिलेले भू-सुधारणा विधेयक, एपीएमसी दुरुस्ती विधेयक व कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत. जिल्हा व तालुका केंद्रांवर बंदचे आवाहन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर व जिल्हय़ात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
रविवारी सकाळी कन्नड साहित्य भवन येथे विविध संघटनांची बैठक झाली. सोमवारी सकाळी 11 वाजता कित्तूर चन्नम्मा चौकापासून सुवर्ण विधानसौधपर्यंत मोर्चा काढण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. बंदला विविध संघटनांनी पाठिंबा दिला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हय़ात बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
कर्नाटक बंदच्या पार्श्वभूमीवर सोमवारी होणारी दहावीची पुरवणी परीक्षा व राणी चन्नम्मा विद्यापीठासंबंधीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. दरम्यान, काँग्रेसने शेतकऱयांची दिशाभूल सुरू केली असून भू-सुधारणा विधेयकासह कृषीसंबंधीचे कायदे शेतकऱयांच्या हिताचे आहेत, असे सांगत राज्यसभा सदस्य व कृषी मोर्चा अध्यक्ष इराण्णा कडाडी यांनी शेतकऱयांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले आहे.
सरकारी बससेवा सुरू राहणार
विविध संघटनांनी बंदला पाठिंबा दिला असला तरी सरकारी बससेवा सुरू राहणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी दिली आहे. बेंगळूरसह संपूर्ण राज्यात बससेवा असणार आहे. परिवहन मंडळाचे कर्मचारी किंवा संघटना बंदमध्ये सहभागी होणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले आहे.
कायदा हातात घेतल्यास कडक कारवाई
यासंबंधी जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी रविवारी रात्री बंदचे आवाहन करणाऱया संघटनांना शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. कायदा हातात घेऊन सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, वाहतूक अडविणे, दमदाटीने दुकाने बंद पाडणे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. कायदा हातात घेणाऱयांवर कडक कारवाई करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर पोलीस स्थानकनिहाय संघटनांच्या नेत्यांशी चर्चा करण्यात आली आहे. सध्या कोरोनाचा फैलाव वाढतो आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर व इतर सुरक्षितता बाळगण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
बेळगावातही खबरदारी
बंदच्या पार्श्वभूमीवर सोमवारी होणाऱया शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शेतकरी सुवर्णविधान सौधला घेराव घालण्याची शक्मयता गृहित धरून आवश्यक तयारी करण्यात आली आहे.