सानिका देसाई सांगतात एका बदलाची गोष्ट
हळदीकुंकू समारंभात दिले आधुनिकतेचे वाण
प्रतिनिधी / सावंतवाडी:
बदल घडवायचा असेल तर त्याची सुरुवात स्वत:पासून करावी लागते. काहीवेळा विरोध होतो. पण कालांतराने इतरांनाही ते पटते आणि तेदेखील अनुकरण करू लागतात. असेच आधुनिकतेचे वाण देण्याची हिम्मत दाखवलीय ती सावंतवाडीच्या सानिका संजीव देसाई यांनी. त्यांनी आपल्या घरच्या हळदीकुंकू समारंभाला सवाष्ण महिलांसोबतच विधवांनाही निमंत्रित करून त्यांना मान दिला.
आपल्या समाजातील रुढी-परंपरा वर्षानुवर्षे आहेत की ज्या आज कालबाहय़ होऊ पाहताहेत. मात्र, सामाजिक दबावामुळे या बदलाची सुरुवात कशी करावी, असा प्रश्न उभा राहतो. त्यातून मग कोंडी कायम राहते.
पतीच्या निधनानंतर अनेक महिलांचा आधार तुटतो. काहीजणी सक्षमतेने पुन्हा उभ्या राहतात. तर काही कोलमडून जातात. त्यात त्यांच्याकडे पाहण्याचा सामाजिक दृष्टिकोन त्यांच्या प्रगतीच्या आड येतो. पतीच्या निधनानंतर सार्वजनिक समारंभात वावरतांना निर्बंध येतात. एकप्रकारे त्यांच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच होतो. त्यात अल्पवयात पती गेला तर मोठे संकटच उभे राहते.
सावंतवाडीच्या सानिका देसाई यांनाही हे सारे खटकत होते. त्यात त्यांच्याच एका समवयस्क मैत्रिणीचा पती अकाली वारला. दरवर्षी आपल्याकडे येणारी ही मैत्रिण आता आपल्याकडे हळदीकुंकवाला येणार नाही, याची रुखरुख त्यांच्या मनात होती. त्यामुळे त्यांनी सासूबाईंशी बोलून तिला बोलावण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाने त्या मैत्रिणीच्या आयुष्यातही काही क्षण आनंदाचे आले.
मैत्रिणीचा नवरा वारला, तेव्हा…
आपल्या या निणर्याविषयी सानिका देसाई सांगतात, जीवनात काही प्रसंग असे घडतात की ज्यामुळे आतापर्यंत जपलेली भीडभाड, ’लोक काय म्हणतील?’ हा
प्रश्न गळून पडतो आणि माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीकडेदेखील धैर्य येते. माझ्या जीवनात अशीच एक गोष्ट सात वर्षांपूर्वी घडली. माझ्या जीवाभावाच्या माझ्याच वयाच्या मैत्रिणीचा नवरा अचानक वारला. तिचं बिचारीचं विश्वच बदलून गेलं. साथी गमावल्याचं, प्रेमाचं माणूस गमावल्याचं तिचं दुःख मला कळत होतं. पण तिचं सामाजिक स्थान हरवल्याची जाणीव मला त्या वर्षीच्या संक्रातीत प्रकर्षाने झाली. आदल्या वर्षीपर्यंत तिला हळदीकुंकवाला आवर्जून बोलावणाऱयांनी त्या वर्षी तिला बोलावलं नाही. मी खूप अस्वस्थ झाले. मी माझ्या सासूबाईंशी बोलले. त्या म्हणाल्या, ‘तू बोलाव की तिला!’ त्यांच्या पाठिंब्यामुळे मी तिला आमच्या घरी हळदीकुंकू समारंभाला बोलावलं. ती आली. पण हे जाहीरपणे बोलायची ना तिला हिम्मत झाली, ना मला. पण जसजशी वर्षे गेली आणि तिच्याप्रमाणेच इतर काहीजणींना मी बोलावू लागले आणि त्या येऊ लागल्या तसतशी मला हिम्मत वाटू लागली. कालबाह्य रुढी मोडायला हव्यात. माझ्याप्रमाणे अनेकजणींना त्या मोडाव्याशा वाटतात. त्यासाठी कोणीतरी सुरुवात करावी लागते. खरे तर अशी सुरुवात मी माझ्या आईच्याबाबतीत 23 वर्षांपूर्वी करू शकले असते. पण हिम्मत झाली नाही. पण माझ्या मैत्रिणीवरील प्रसंगाने मी हादरून गेले आणि माझ्यात हिम्मत आली आणि आज सात वर्षांनी ते जाहीरपणे सांगण्याचीदेखील हिम्मत आली.
डॉ. पाटकर यांचा अनुभव
बांदा येथील सामाजिक कार्यकर्त्या आणि डॉ. रुपेश पाटकर यांच्या आई वैदेही पाटकर यांनी 2006 मध्ये ज्यावेळी त्यांचे पती आनंद पाटकर यांचे निधन झाले, त्यानंतर आपले मंगळसूत्र कायम ठेवले. त्यांच्या या निर्णयावर टीकाही व्हायची. तरीही त्या टीकेला सामोऱया गेल्या. गतवर्षीपासून संक्रांतीत डॉ. पाटकर यांच्या घरी हळदीकुंकू केले जाते. मात्र, यात सवाष्ण महिलांसोबतच विधवांनाही मान दिला जातो. गेल्यावर्षी आणि यंदाही चौघीजणी हळदीकुंकवाला आल्या. काहींना बोलावूनही त्या आल्या नाहीत. त्यांच्या घरी जाऊन डॉ. पाटकर यांच्या पत्नी अनुराधा यांनी हळदीकुंकू दिले.
अनेक वर्षांच्या या परंपरा तोडायला वेळ लागेल. पण हळूहळू प्रबोधनातून आपण काही बदल घडवू शकू, असा विश्वास डॉ. पाटकर यांनी व्यक्त केला.