प्रतिनिधी/ बेळगाव
शहराची वाटचाल स्मार्ट सिटीकडे सुरू असल्याने काही रस्त्यांचा विकास करून स्मार्ट बनविण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. मात्र एपीएमसी रोडवरील खड्डे बुजविण्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले असल्याने हा रस्ता वाहनधारकांना धोकादायक बनला आहे. रस्त्याचे काम व्यवस्थित होत नसल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत. आझमनगर परिसरात रस्त्यांच्या काँक्रिटीकरणापूर्वी फुटपाथ व सायकल ट्रक निर्माण करण्यात येत असल्याने काँक्रीटचा रस्ता होणार नाही का? असा प्रश्न नागरिक करीत आहेत.
मनपाची हद्दवाढ झाल्यानंतर शेतकऱयांचा आधार असलेल्या कृषी उत्पन्न बाजारपेठ व परिसराचा समावेश महापालिकेत करण्यात आला होता. पण मार्केट यार्डसह परिसरातील रहिवासी वसाहतीमधील रस्त्यांचा विकास करण्याकडे कानाडोळा करण्यात आला आहे. एपीएमसी रोडचा विकास शंभर कोटी अनुदानामधून करण्यात आला होता. आझमनगर कॉर्नर ते एपीएमसीपर्यंतच्या रस्त्याकरिता निधीची तरतूद करण्यात आली होती. पण मनपाची हद्द कंग्राळी गावाच्या प्रवेशद्वारापर्यंत आहे. मात्र एपीएमसी प्रवेशद्वार ते कंग्राळी गावच्या प्रवेशद्वारापर्यंतचा रस्ता करण्याकडे महापालिका प्रशासनाने कानाडोळा केला होता. यामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे निर्माण झाले आहेत. पण एपीएमसी मार्केट यार्डच्या प्रवेशद्वारावर मोठमोठे खड्डे निर्माण झाल्याने वाहनधारकांना धोकादायक बनले आहे. एपीएमसीमध्ये मालाची ने-आण करण्यासाठी अवजड वाहनांची नेहमी वर्दळ असते. यामुळे हा रस्ता व्यवस्थित करण्याची गरज होती. मात्र महापालिका प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी विकासकामे राबविताना नेहमीच भेदभाव केल्याने या ठिकाणी निर्माण झालेले खड्डे कित्येक वर्षांपासून तसेच आहेत.
मात्र, या रस्त्याचा विकास करण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत निधीची तरतूद करून रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. रस्त्याचे काम सुरू करून दीड वर्ष होत आले. पण कामे अर्धवट अवस्थेत असल्याने वाहनधारकांना खड्डय़ांच्या आणि वाहतूक कोंडीच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. विकासकामे राबविण्याच्या नावाखाली रस्त्याची खोदाई करण्यात आल्याने रस्त्याची स्थिती पाहता कालचा गोंधळ बरा… असे म्हणण्याची वेळ आली आहे. रस्त्याचे काँक्रिटीकरण आणि गटारीकरिता खोदाई करून पाईप घालण्याचे काम करण्यात येत होते. पण रस्त्याशेजारी दगड असल्याने पाईप घालण्याचे काम अर्धवट झाले आहे. सदर काम अर्धवट राहिल्याने काँक्रिटीकरणाकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. पण अलीकडेच रस्त्याच्या एका बाजूचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. बाकीची कामे रखडलेल्या स्थितीत आहेत. सदाशिवनगर क्रॉसपासून रस्त्याचे काम करण्यात येत आहे. काही ठिकाणी गटारींचे बांधकाम करण्यात आले आहे. काही ठिकाणी अर्धवट आहे. स्मशानभूमी परिसरात गटारांचे बांधकाम अद्याप करण्यात आले नाही. पण नेहरूनगरपासून गटारींचे बांधकाम करण्यात येत आहे. जिल्हा पंचायतीच्या व्यापारी संकुलाजवळ गटारीचा मार्ग बदलण्यात आला आहे. त्यामुळे सांडपाण्याचा निचरा होण्यास अडथळा होण्याची शक्यता आहे. बसवाण्णा मंदिर ते बॉक्साईट रोड कॉर्नरपर्यंतच्या एपीएमसी रोडशेजारी गटारी बांधण्यात आल्या. सायकल ट्रकही निर्माण करण्यात आला आहे. पण येथील रस्त्याचे काँक्रिटीकरण अद्याप करण्यात आले नाही. त्यामुळे काँक्रिटीकरण करण्यापूर्वीच सायकल ट्रक निर्माण करण्यात आला आहे. परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून वाहनधारकांना खड्डय़ांमधून प्रवास करावा लागत आहे. फुटपाथ निर्माण करण्याचे काम सध्या रखडले आहे. बॉक्साईट रोड कॉर्नर ते कंग्राळीपर्यंत एपीएमसी रस्त्याच्या एका बाजूचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. दुसऱया बाजूचा रस्ता खूपच खराब झाला आहे. अशातच गटारीच्या पाईप घालण्यासाठी रस्त्याशेजारी खोदाई करण्यात आल्याने वाहनधारकांना कसरत करीत प्रवास करावा लागत आहे. खोदण्यात आलेल्या चरीमध्ये पाणी साचून राहिले असून डासांचा प्रादुर्भाव वाढला असल्याने परिसरातील रहिवाशांचे आरोग्य धोक्मयात आले आहे. वाहतूक सुरू असलेल्या संपूर्ण रस्त्यावर खड्डे निर्माण झाल्याने वाहनधारकांना वाहने चालविणे मुश्कील बनले आहे.
एपीएमसीमध्ये भाजीपाला आणि कांदा-बटाटे वाहतूक करणारी अवजड वाहने आणि कंग्राळी भागातील गावांना जाणाऱया वाहनांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. त्यामुळे वाहनधारकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने आणि वाहतूक सुरळीत होण्याच्यादृष्टीने आवश्यक खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. पण याकडे स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱयांचे आणि कंत्राटदाराचे दुर्लक्ष झाले आहे. एपीएमसीपासून कंग्राळी परिसरातील रस्ता खूपच खराब झाला असून या परिसरातील रस्ता करण्यासाठी खोदाई करण्यात आल्याने चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या ठिकाणी रस्ता अरुंद असल्याने वाहनधारकांना मोठी अडचण बनली आहे. परिणामी वाहतूक कोंडी होत आहे. येथील रस्ता धोकादायक बनल्याने अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. सदर रस्त्याचे काम नियोजनबद्ध करण्यात येत नसून निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत.