प्रतिनिधी/ बेळगाव
इंग्रजांनी लादलेल्या गुलामगीरीच्या बेडय़ा खळा खळा तुटल्या आणि देश स्वतंत्र झाला. ‘चरखा चला चला के, लेंगे स्वराज्य हम’ हा महात्मा गांधींनी दिलेला कृतीशील कानमंत्र वास्तवात साकारला. याचेच स्मरण सर्वांना व्हावे या हेतूने टिळकवाडी हायस्कूलचे चित्रकला शिक्षक मारूती आंबेवाडकर यांनी हा इतिहास रांगोळीच्या माध्यमातून साकारला आहे.
वरेरकर नाटय़ संघाच्या सभागृहात त्यांनी ही रांगोळी काढली आहे. भारताचा नकाशा त्याच्या अलिकडे आणि पलिकडे बेडय़ांची साखळी, ती तोडून मुक्तपणे विहरणारा पक्षी आणि चरखा चालवून सूत कातणारे महात्मा गांधीजी अशी रांगोळी मारूती यांनी रेखाटली आहे.
ही रांगोळी काढण्यासाठी त्यांना 12 तासाचा अवधी लागला. आझादी का अमृत महोत्सवअंतर्गत त्यांनी ही रांगोळी काढली आहे. रांगोळी अत्यंत कलात्मक असून, चरख्यावर सूत कातणारे गांधीजी यांचे चित्र हुबेहुब साकारण्यामध्ये मारूती यांचे कौशल्य दिसून येते. संघाच्या के. बी. कुलकर्णी दालनामध्ये सकाळी 10 ते 1 व दुपारी 4 ते 7 या वेळेत ही रांगोळी सर्वांना पाहता येईल. मात्र कोविड नियमांचे पालन आवश्यक आहे असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.