प्रतिनिधी /पणजी
सिद्धी नाईक हिच्या जन्मदिवशी तिला पणजीतील आझाद मैदानावर गोवा प्रदेश युवक काँग्रेसतर्फे श्रद्धांजली अर्पण करुन मेणबत्या पेटविण्यात आल्या आणि तिच्या मृत्यूची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली. तिच्या मृत्यूचे कारण शोधण्यास पोलीस खात्याला अपयश आले असून तिचा खून झाल्याचा संशय आहे म्हणून तिचे मारेकरी कोण ते शोधून काढावे असे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी सांगितले. सिद्धीचे कुटुंबिय त्यावेळी उपस्थित होते.
आझाद मैदानावर हुतात्मा स्मारकाकडे हा कार्यक्रम झाला. कामत पुढे म्हणाले की, दोन महिने उलटले तरी तिच्या मृत्यूचा तपास लागत नाही हे संतापजनक आहे. एकीकडे सरकार ‘आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा’ अशी घोषणाबाज करते तर दुसरीकडे गोव्यात खुनांची मालिकाच चालू आहे. मुली – महिलांसाठी तर धोकाच निर्माण झाला असून सरकारने या प्रकरणी गांभिर्याने लक्ष देण्याची गरज आहे, असे कामत यांनी नमूद केले. चौकशीत अपयश आल्यामुळे सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. युवक काँग्रेस अध्यक्ष वरद म्हार्दोळकर, बीना नाईक, अमरनाथ पणजीकर, उदय मडकईकर, तुलियो डिसोझा, अर्चित नाईक, सिद्धीचे वडील संदीप नाईक यांची भाषणे झाली. सर्वांना सरकारवर तोफ डागली. हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असून तसा संशय येत असल्याचे अनेकांनी नमूद केले. शेवटी सर्वांनी सिद्धीच्या प्रतिमेसमोर मेणबत्ती पेटवून तिला आदरांजली अर्पण केली.