मूर्तीकारांच्या ‘डिस्टनसिंग’च्या अवाहनाला भक्तांचा प्रतिसाद
प्रतिनिधी/ रत्नागिरी
यावर्षीच्या गणेशोत्सवावर कोरोनाचा प्रभाव आहे. उत्सव साजरा करण्यावर विविध बंधने आली आहेत. याचाच एक भाग म्हणून भक्तांनी आठवडाभर आधीपासूनच टप्प्याटप्प्याने लाडक्या बाप्पाच्या मूर्ती घरी नेण्यास सुरुवात केली आहे. गणपती बाप्पाला घरी नेण्यासाठी भाविकांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन मूर्तीकारांनी प्रत्येक भाविकाला वेळ निश्चित करून दिली आहे. त्यानुसार भक्त मूर्ती घरोघरी नेऊ लागले आहेत.
गणेशोत्सव म्हणजे सर्वत्र आनंद, उत्साहाला उधाण आलेले असते. पण यावेळचा उत्सव अनेक नियमावलीत अडकला आहे. गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी व प्रतिष्ठापनेच्या दिवशी गणेश चित्रशाळांमधून लाडक्या बाप्पाला घरी नेण्यासाठी मोठी गर्दी होते. बाप्पाच्या वाजतगाजत मिरवणुका निघतात. मात्र यावर्षी या जल्लोषावर कोरोनामुळे बंधने आली आहेत. भक्तांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन अनेक मुर्तीकारांनी 8 दिवसांपासूनच मूर्ती वितरण सुरु केले आहे. याकरिता मूर्तीकारांनी प्रत्येक भाविकाला वेळ ठरवून दिली आहे.
मूर्तिशाळात सॅनिटायझर, मास्क व सामाजिक अंतर राखून मूर्ती रवाना केल्या जात आहेत. सर्वच चित्रशाळांनी गर्दी करू नये, मूर्ती पाहण्यासाठी येऊ नये, असे फलक लावले असून वेळेआधीच गणपती मूर्ती द्यायच्या असल्याने अखेरचा हात फिरवण्याची मूर्तीकारांची लगबग सुरू आहे. सुमारे पन्नास टक्के मूर्ती भाविकांच्या घरी दाखल झाल्या असून उर्वरित मूर्ती लवकरच दाखल होणार आहेत.
जिह्यात यावर्षी 1 लाख 66 हजार 660 घरगुती गणपतीचे पूजन
करोनाच्या पार्श्वाभूमीवर रत्नागिरी जिह्यात घरगुती गणेशोत्सवाच्या संख्येत घट होण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र प्रत्यक्षात 73 गणपतींची वाढच झाली आहे. गतवर्षी जिह्यात 1 लाख 66 हजार 587 घरगुती गणेशोत्सव होते. यावर्षी 1 लाख 66 हजार 660 घरी गणपतीचे पूजन केले जाणार आहे. गेल्यावर्षी 112 सार्वजनिक गणेशोत्सव होते. यामध्ये घट होऊन ती संख्या यावर्षी 108 झाली आहेत. घरगुती गणेशोत्सव हे रत्नागिरी जिह्याचे वैशिष्टय़ असल्याने सार्वजनिक गणेशोत्सवापेक्षा घरगुती गणेशोत्सवाला अधिक महत्त्व आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर घरगुती गणेशोत्सवामध्ये घट होईल, असा अंदाज होता प्रत्यक्षात 73 गणेशमुर्तींची वाढ नोंदवण्यात आली आहे.