प्रतिनिधी / निपाणी
कोरोना संसर्गानंतर लागू केलेल्या लॉकडाऊनला वर्षपूर्ती नुकतीच झाली. यानंतर दुसऱया टप्प्यात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढले आहे. याची दखल घेत राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाने पुन्हा निर्बंध आणि नियमावली जारी केली आहे. मास्कचा वापर सक्तीचा केला आहे. यात्रा-जत्रा आणि सण समारंभांवर निर्बंध घातले आहेत. निपाणी शहरातील आठवडी बाजारावरही निर्बंध घालताना अंमलबजावणी करताना खबरदारी घेण्यात आली. मात्र येथील आंबा मार्केटमध्ये भरणाऱया फळ-भाजीपाला घाऊक बाजारात नियमावलीचा फज्जा उडाल्याचे चित्र पहावयास मिळाले.
दुसऱया टप्प्यात कोरोनाने थैमान घातले आहे. राज्यात सहा हजाराच्या घरात रुग्ण आढळले आहेत.
आहेत. नजीकच्या महाराष्ट्रात तर कोरोना रुग्णांची संख्या 50 हजाराच्या घरात आहे. तर आपल्या बेळगाव जिल्हय़ात बुधवारी एका दिवशी कोरोना रुग्णांचे शतक गाठले. यामुळे वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नियमावलीचे पालन काटेकोरपणे करणे गरजेचे आहे. असे असताना नियमावली अनेक ठिकाणी कागदावरच असल्याचे पहावयास मिळत आहे.
निपाणी पालिकेवतीने गुरुवारी भरणारा आठवडी बाजारावर निर्बंध घालताना नजीकच्या महाराष्ट्रातून येणाऱया व्यापाऱयांना परवानगी नाकारण्यात आली होती. याची अंमलबजावणी करताना गुरुवारी बाजारात आलेल्या व्यापाऱयांचे आधारकार्ड तपासणी करण्यात येत होती. यासाठी पालिकेचे कर्मचारी बाजार मार्गावर ठाण मांडून होते. त्यामुळे गुरुवारी आठवडी बाजारात केवळ 30 टक्के व्यापारी, भाजी विक्रेते दिसून आले. पालिकेने मंगळवारी व बुधवारी आठवडी बाजारावर निर्बंध घातल्याची रिक्षाद्वारे जागृती केली होती. त्यामुळे आठवडी बाजारात महाराष्ट्रातील व्यापारी दिसून आले नाहीत. याउलट निपाणी येथीलच आंबा मार्केटमध्ये फळ-भाजीपाला घाऊक खरेदी-विक्रीसाठी तोबा गर्दी होताना नियमांचे पालन होत नसल्याचे पहावयास मिळाले. तसेच याठिकाणी निपाणी परिसरातील अनेक खेडय़ातील यात काही महाराष्ट्रातील व्यापारीही दाखल झाले होते. मात्र याठिकाणी कारवाईकडे डोळेझाक करण्यात आली होती. यामुळे एकीकडे आठवडी बाजारात कार्यवाही करताना निर्बंध तर दुसरीकडे फळ-भाजीपाला घाऊक बाजारात उल्लंघन असेच चित्र पहावयास मिळाले. यामुळे प्रशानसाच्या या निष्काळजीपणाचा फटका बसताना संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. याची दखल घेत योग्य ती कार्यवाही होताना खबरदारी घेणे गरजेचे आहे.