चिकोडीतील चित्र : नियमांचे उल्लंघन : कोरोनाचा फैलाव रोखण्याची गरज
वार्ताहर / चिकोडी
चिकोडी शहरात सध्या हजारहून अधिक कोरोना रुग्णांची संख्या आहे. ही संख्या कमी करण्यासाठी आरोग्य व पोलीस प्रशासनातर्फे उपाययोजना राबविण्यात येत आहेत. पण येथील आठवडी बाजारात मात्र उलट परिस्थिती पहावयास मिळत आहे. सामाजिक अंतर न राखता, आरोग्याची काळजी न घेता खरेदी-विक्रीसाठी बाजारपेठेत नागरिकांनी गर्दी केल्याचे दिसून आले. यावरून सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाल्याचे दिसून आले.
चिकोडीतील आठवडी बाजारासाठी परिसरातील अनेक व्यापारी येथे दाखल होतात. जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी येणाऱया नागरिकांकडून केवळ मास्कचा वापर केला जात असून, तो कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी पुरेसा नाही. तर सामाजिक अंतर ठेवत नियमांचे पालन करत व्यवहार होण्याची गरज आहे. पण त्याकडे दुर्लक्ष करताना नागरिक दिसत आहे.
फळे, पालेभाज्यांचे निर्जंतुकीकरण होते की नाही? हा अद्याप अनुत्तरीत प्रश्न आहे. असे असताना बाजारपेठेत होणारी मोठी गर्दी कोरोनाचा प्रादूर्भाव वाढविण्यासाठी पूरक ठरत आहे. सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होत चालल्याने नागरिकांनी धाडस करत सर्व व्यवहार पूर्ववत सुरु केले आहेत. पण रोगप्रतिकारशक्ती कमी असणाऱयांसाठी ही वेळ धोक्याची आहे. याचा विचार करण्याची गरज आहे.
बाजारपेठेतील काही दुकानदार व व्यापाऱयांनी आपल्या व ग्राहकांच्या सोयीसाठी प्लास्टिक व हातमोजांचा उपयोग केल्याचे दिसून आले. पण व्यवहारात होणारी पैशाची देवाण-घेवाण कोरोनाचा फैलाव होण्यासाठी पूरक ठरत आहे. अशावेळी रोखीच्या व्यवहाराबरोबर शक्य त्याठिकाणी ऑनलाईन व्यवहार केल्यास फायदा होणार आहे.
दरवाढीचा ग्राहकांना फटका
पीक काढणीच्या काळातच या भागाला पावसाने झोडपून काढले. त्यामुळे उत्पादनात घट निर्माण झाली. आवक घटल्याने पालेभाज्या व फळभाजांचे दर वाढल्याचे दिसून आले. गवारी व वांग्याने प्रतिकिलो शंभरी तर ढबू मिरची, कारले, कांद्याने अर्धशतकी पार केली. तर पालेभाजांचे दर प्रति पेंडी 20 ते 25 रुपये आहेत. या दरवाढीचा फटका मात्र सर्वसामान्य ग्राहकांना बसल्याचे दिसून आले.
खबरदारी हाच प्रमुख उपाय
आज कोरोनाचे संकट सर्वच क्षेत्रावर पसरले आहे. अशा परिस्थितीत कोरोनाची चाचणी व औषधांचा खर्च लाखोंच्या पटीत आहे. किरकोळ कारणांसाठी घराबाहेर येण्याचे टाळणे गरजेचे आहे. तसेच कोरोनाची लागण झालेले नागरिक बिनधास्त बाजारपेठेतून फिरत आहेत. हा सर्वात मोठा धोका आहे. याची दखल घेत नागरिकांनी खबरदारी घेणे हा प्रमुख उपाय आहे.