प्रतिनिधी/ बेळगाव
शनिवारच्या आठवडी बाजारात नेहमीप्रमाणे शहराच्या मध्यवर्ती भागात तसेच शहापूर मार्केटमध्ये गर्दी झाली. भाजी आणि किराणा साहित्य खरेदीसाठी ही गर्दी झाली. वाढत्या गर्दीमुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे आणि सामाजिक अंतराच्या नियमांचा पूर्ण फज्जा उडत आहे.
लॉकडाऊनमुळे कंटाळलेले नागरिक कधी एकदा बाहेर पडायला मिळते, या प्रतीक्षेत होते. त्यामुळे लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर नागरिकांनी बाजारपेठेत एकच गर्दी केली. शनिवारी कार्यालयांना अर्धा दिवस सुटी असल्याने आणि रविवारी पुन्हा संचारबंदी लागू होईल की काय? या भीतीने बाजारपेठेत गर्दी झाली. प्रत्येकाच्या गरजा आणि आवश्यकता वेगळय़ा. त्यानुसार खरेदी सुरू असली तरी बाजारपेठेत मात्र सामाजिक अंतराचा नियम पाळणे कठीण होत आहे.
प्रत्येकाला आपली खरेदी महत्त्वाची असते. तुम्ही नियम पाळा अशीच धारणा दिसते. मास्क मात्र बहुसंख्य जणांनी लावल्याचे दिसून आले. लवकरच पावसाळा सुरू होणार असल्याने शेतकऱयांनी आपली खरेदी उरकून घेतली. महिलावर्गाने प्राधान्याने धान्य आणि मिरची यांची खरेदी अधिक प्रमाणात केली. बी-बियाणांची खरेदीसुद्धा सुरू आहे.
त्या तुलनेत वस्त्रप्रावरणे व हातमागाच्या (टेक्स्टाईल) दुकानांत गर्दी कमी दिसून येते. मात्र सराफी पेढय़ांमध्ये हळुहळु ग्राहक खरेदीसाठी येत असल्याचे दिसून आले. गुरुपुष्यामृताचा मुहूर्त साधून पोतदार ज्वेलर्सच्या दुकानात गर्दी झाली. परंतु सॅनिटायझर, मास्क आणि सामाजिक अंतर हे नियम कटाक्षाने पाळले गेल्याचे चालकांनी सांगितले. पीएनजी ज्वेलर्समध्येसुद्धा गुरुपुष्यामृताचा मुहूर्त साधण्यासाठी गर्दी झाली. शिवाय लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर हळुहळु ग्राहक येत असल्याचे सांगण्यात आले. सलून आणि ब्युटीपार्लर सुरू झाल्याने सौंदर्यप्रसाधने दुकानांत खरेदी सुरू झाली आहे. या दुकानांना सरकारने नियमावली ठरवून दिल्याने गाऊन, टिशुपेपर यांची खरेदी नेहमीपेक्षा अधिक प्रमाणात होत आहे. एकूणच शनिवारचा आठवडी बाजार पुन्हा एकदा तेजीने सुरू झाला आहे. मात्र, वाहतूक कोंडी ही मोठी डोकेदुखी ठरणार आहे. यावर नियंत्रण ठेवताना पोलिसांची दमछाक होत आहे.