प्रतिनिधी/ बेंगळूर
शिक्षणमंत्री सुरेशकुमार यांची माहिती : शाळा सॅनिटाईज करण्यावर भर देणार : अभ्यासक्रमात कपात करणार
1 जानेवारीपासून दहावी, बारावी वर्ग व विद्यागम योजना सुरू करण्यात येणार आहे. दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांवर कोणताही ताण पडू नये, अशा पद्धतीने अभ्यासक्रमात कपात करून आठवडय़ाभरात अभ्यासक्रम जाहीर करण्यात येणार आहे, असे असे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री सुरेशकुमार यांनी सांगितले.
कोरोना काळात शाळा सुरू करणे हे सरकारसमोर एक मोठे आव्हान आहे. गत जून आणि जुलै महिन्यात झालेली दहावी परीक्षा मोठय़ा आव्हानाद्वारे यशस्वीरित्या पार पडली. त्यावेळी लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था आणि प्रसारमाध्यमांनी दिलेल्या सहकार्यामुळे दहावी परीक्षा सुरळीत पार पाडण्यास मदत मिळाली. त्याचपद्धतीने आता विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि त्यांच्या शैक्षणिक भविष्याकडे अधिक लक्ष देऊन आवश्यक व्यवस्था करणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे, असे फेसबुकद्वारे मंत्र्यांनी सांगितले आहे.
राज्यात 1 जानेवारीपासून दहावी-बारावी वर्ग आणि विद्यागम योजना सुरू करण्यात येणार आहे. यासाठी पालक, एसडीएमसी, शिक्षकांचे सहकार्य आवश्यक आहे. 2020 च्या दहावी परीक्षा केंद्रांमध्ये कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ज्या पद्धतीने पावले उचलली होती. त्याच पद्धतीने आता शाळांपासूनही कोरोनाला दूर ठेवण्यासाठी उपाययोजना आखण्यात येत आहे. दहावी परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांनी ज्या पद्धतीने खबरदारी घेतली होती. ती संपूर्ण राज्याला आदर्श ठरली होती. त्याच पद्धतीने आता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी खबरदारी घेऊन कोरोनाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, असेही मंत्री सुरेशकुमार यांनी सांगितले.