परिवहन कर्मचाऱयांचा संप सुरूच : प्रवाशांचे हाल कायम : सरकार-आंदोलक भूमिकेवर अद्यापही ठाम
प्रतिनिधी / बेंगळूर
सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार वेतन देण्याची मागणी करून राज्य परिवहन कर्मचाऱयांनी पुकारलेला संप बुधवारी आठव्या दिवशीही सुरूच होता. त्यामुळे परिवहनची प्रवासी बससेवा अद्याप सुरू झालेली नाही. परिणामी नागरिकांचे हाल होत आहेत. कार्यालये, कंपन्या आणि कामावर जाणाऱयांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
परिवहन कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम असून सरकारनेही तडजोड न करण्याची भूमिका घेतल्याने मागील आठ दिवसांपासून तिढा सुटलेला नाही. दरम्यान, राज्य सरकारने खासगी प्रवासी वाहनांना परिवहनच्या बस डेपोमध्ये वाहने आणून प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी दिल्याने शहरी भागात जाणाऱयांची सोय झाली आहे. मात्र, ग्रामीण भागाकडे जाण्यासाठी वाहनांची सोय नसल्याने जनतेची गैरसोय होत आहे. परिवहनचे काही कर्मचारी कामावर हजर झाले असून मोजक्याच बसेस रस्त्यावर धावत आहेत.
बेळगावसह हुबळी, बेंगळूर, चित्रदुर्ग, म्हैसूर, मंडय़ा, हासन, रायचूर यासह राज्यातील अनेक ठिकाणी परिवहन मंडळाच्या बसेस डेपोमध्ये थांबून आहेत. संप सुरू असल्याने नागरिक बस स्थानकांमध्ये येणेही टाळत आहेत. दरम्यान, संपकऱयांनी दररोज वेगवेगळय़ा पद्धतीने आंदोलन सुरू केले आहे. परिवहन कर्मचाऱयांची कुटुंबीयही आंदोलनात सहभागी होत आहेत.
मागील आठ दिवसांपासून संप सुरू असून देखील सरकारने संपकऱयांशी चर्चा करण्याची तयारी दर्शविलेली नाही. तर परिवहन कर्मचारी संघटनेने देखील मागण्यांची पुर्तता झाल्याशिवाय कामावर हजर होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे बसेसवर अवलंबून असणाऱया सर्वसामान्य वर्गातील प्रवाशांचे मात्र हाल होताना दिसत आहे.
आठ दिवसांत 152 कोटींचे नुकसान
सहावा वेतन आयोग जारी करण्याची मागणी करून परिवहन कर्मचारी संपावर गेल्याने राज्य परिवहन महामंडळाचे दररोज कोटय़वधींचे नुकसान होत आहे. मागील आठ दिवसांत तब्बल 152 कोटी रुपयांचा फटका बसला आहे. केएसआरटीसीला दररोज 7 कोटी रुपये उत्पन्न मिळते. तर बेंगळूर शहर परिवहन मंडळाला (बीएमटीसी) प्रतिदिन 3 कोटी रु., वायव्य आणि ईशान्य परिवहन निगमला प्रत्येकी 3.5 कोटी रुपये उत्पन्न मिळते. मात्र, संपामुळे बससेवा ठप्प असल्याने आतापर्यंत 152 कोटी रुपयांचा फटका बसला आहे. मागील आठ दिवसांत केएसआरटीसीला 70 कोटी रु., बीएमटीसीला 20 कोटी रु., वायव्य परिवहन निगमला 30.5 कोटी रु. आणि ईशान्य परिवहन निगमला 31.5 कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागले आहे.