प्रतिनिधी / पणजी
अलिकडेच ‘तौक्ते’ या चक्रीवादळाने बाधित व नुकसानी झालेल्या लोकांना राज्य सरकारने रू. 20.66 लाख आर्थिक मदत भरपाई देण्यासाठी मंजूर केली आहे. दोन्ही जिल्हा व्यवस्थापन निधीतून ती मदत देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या मंजूरीचा आदेश तालुका मामलेदारांना पाठवण्यात आला आहे. शिवाय राज्य सरकारने यापूर्वीच वादळातील मृतांच्या नातेवाईकांना रू. 4 लाखाची भरपाई जाहीर केली आहे.
तिसवाडी, पेडणे, सत्तरी, डिचोली, काणकोण, धारबांदोडा, सासष्टी, मुरगाव या तालुक्यांना मदत देण्यात येणार आहे. सांगे, केपे, फोंडा व बार्देश या तालुक्यांसाठी मात्र कोणतीही मदत जाहीर करण्यात आलेली नसल्याने आश्चर्य प्रकट होत आहे किंवा त्या तालुक्यांना नंतर मदत जाहीर करण्यात येणार असल्याची शक्यता आहे.
पंतप्रधानांकडूनही मदत जाहीर
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही चक्रीवादळातील मृतांच्या नातेवाईकांना रू. 2 लाख व गंभीर जखमीना रू. 50,000 अनुदान जाहीर केले आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, राज्याला अंदाजे रू. 140 कोटी नुकसान झाले आहे. अंदाजे 200 हून अधिक घरांचे मोठे-किरकोळ नुकसान झाले असून त्यांना सरकार नुकसान भरपाई देण्यार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांना आर्थिक मदतीसाठी पुन्हा एकदा पत्र पाठवून मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तालुकानिहाय मंजूर निधी
- तिसवाडी रू. 4.28 लाख
- पेडणे-रू. 1.09 लाख
- सत्तरी-रू. 67,000
- डिचोली-रू. 10.40 लाख
- काणकोण-रू. 88,000
- धारबांदोडा- रू. 30,000
- सासष्टी-रू. 2.71 लाख
- मुरगाव-रू. 32,000