प्रतिनिधी/ सातारा
सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात बाधित वाढीचा आलेख खाली आल्यानंतर नोव्हेंबरच्या आरंभापासून तो 50 च्या खाली राहिल्याचा दिलासा असला तरी 7 नोव्हेंबरची फक्त 11 बाधित वाढ सोडली तर त्यानंतर वाढीचा आलेख 20 ते 30 दरम्यान स्थिर झालेला आहे. पॉझिटिव्हीटी दर 1 टक्के व त्यापेक्षाही खाली जावून आला असून तो सध्या 1 टक्केवर स्थिर आहे. जिल्हय़ात लसीकरणाने सोमवारपासून वेग घेतला होता. मात्र रविवारी फक्त 1 हजार 308 जणांचे लसीकरण झाले आहे. सध्या एक अंकी संख्येने काही तालुक्यात नवीन बाधित समोर आलेली आहे.
दरम्यान, शनिवारी रात्री प्रशासनाकडून इंडियन कोव्हिड पोर्टलवरुन देण्यात आलेल्या माहितीनुसार 31 जणांचा अहवाल बाधित आला. तर एकाही बाधिताचा मृत्यू झाला नसल्याची नोंद असून कोरोनामुक्तीचा रकानाही निरंक असल्याने रविवारी कोरोनामुक्तीचा संख्या शुन्यावर राहिली आहे.
आठ तालुक्यात अल्प वाढ, तीन निरंक
बाधित वाढीचा वेग मंदावला असून सलग 13 व्या दिवशी बाधित वाढीचा आलेख 50 च्या खाली राहिलेला आहे. मात्र, तो 20 ते 30 या दरम्यान स्थिर असून काही तालुके निरंक रहात असले तरी पुन्हा तिथे अल्प वाढ दिसून येत आहे. यामध्ये कराडसह सर्व तालुके शुन्यावर जावून आले आहेत. मात्र, सातारा तालुक्यात एक अंकी वाढ सुरुच आहे. शनिवारी अहवालानुसार आठ तालुक्यांमध्ये अल्प वाढ असून तीन तालुके निरंक राहिल्याचा दिलासा लाभलेला आहे.
31 जणांचा अहवाल बाधित
शनिवारी रात्रीच्या अहवालानुसार आजचे व आजअखेर बाधित झालेल्यांची तालुकानिहाय आकडेवारी अशी आहे. सातारा 7 (52,069), कराड 5 (39,250), फलटण 4 (37,423), कोरेगाव 4 (21,955), खटाव 4 (25,894), पाटण 3 (10,148), माण 2 (18,018), खंडाळा 1 (14,197), जावली 0 (10,045), वाई 0 (15,775), महाबळेश्वर 0 (4,722) इतर (2,183) अशी एकूण 2,51,679 आजअखेर बाधित झालेल्याची संख्या आहे.
कोरोनामुक्ती 2 लाख 44 हजारांवर स्थिर
गेल्या काही दिवसात कोरोनामुक्तीचा वेगही मंदावला होता. मात्र मंगळवारी कोरोनामुक्तीचा वेग वाढला असून 188 जणांना घरी सोडण्यात आले होते. मात्र, त्यानंतर कोरोनामुक्तीचा वेगही घटला असून शनिवारी अहवालात कोणालाही घरी सोडण्यात आले नव्हते. त्यामुळे गत चार दिवसांपासून कोरोनामुक्ती 2 लाख 44 हजार 38 वर स्थिर आहे. तर जिल्हय़ात एकूण बाधित झालेल्यांची संख्या 2 लाख 51 हजार 679 एवढी झाली आहे.
रविवारी फक्त 1,301 जणांना लस
दैनंदिन 10 हजारांच्या पटीत सुरु असलेला लसीकरणाचा वेग रविवारी मंदावला होता. सुट्टीमुळे काहीच लसीकरण केंद्रे सुरु असल्याने फक्त 1 हजार 301 नागरिकांना लस मिळाली. यामुळे जिल्हय़ातील लस घेणाऱया नागरिकांची एकूण संख्या 29 लाख 14 हजार 366 एवढी झाली आहे. यामध्ये पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 19 लाख 82 हजार 87 एवढी झाली असून दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 9 लाख 32 हजार 279 एवढी झालेली आहे.