स्थानिकांमधून संताप, पाण्यासाठी होताहेत हाल
प्रतिनिधी /बेळगाव
सुरळीत पाणीपुरवठय़ाची शहरातील समस्या अद्याप सुटलेली नाही. नाझर कॅम्प वडगाव येथे 8 दिवसांतून एकदा पाणीपुरवठा केला जात आहे. पाणी नसल्यामुळे स्थानिकांमधून प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. खासगी टँकर अथवा इतर गल्लीमधून पाणी आणण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे.
मागील महिन्यात पाणीपुरवठा कर्मचाऱयांचा संप असल्यामुळे अनियमित पाणीपुरवठा सुरू होता. आता कोठे सुरळीत पाणीपुरवठा केला जात असतानाच नाझर कॅम्प वडगाव येथे आठ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा केला जात आहे. ज्यांच्याकडे सिंटेक्स टाकी अथवा इतर पाणी साठविण्याची व्यवस्था आहे त्यांची तितकिशी गैरसोय होत नसली तरी इतर नागरिकांची मात्र मोठी गैरसोय होत आहे. पाणी नसल्याने महिलावर्गाला आजूबाजूच्या परिसरातून मिळेल तेथून पाणी आणावे लागत आहे.
कर्मचाऱयांचे अजब उत्तर…
काही नागरिकांनी पाणीपुरवठा करणाऱया कर्मचाऱयांना पाणी न आल्याबद्दल जाब विचारला असता हिडकल येथून सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याचे अजब उत्तर दिले. बाजूच्या भागात सुरळीत पाणीपुरवठा होत असताना नाझर कॅम्पमध्येच पाणीपुरवठा करण्यास कोणती समस्या येत आहे? असा प्रश्न नागरिक करीत आहेत.