प्रवाशांची गैरसोय : बसस्थानकावर स्वच्छता राखण्याच्यादृष्टीने आवश्यक उपाययोजना राबविण्याची गरज
प्रतिनिधी /बेळगाव
बस प्रवाशांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्याच्यादृष्टीने प्रशासनाकडून निधी खर्च करण्यात येत आहे. मात्र काही ठिकाणी स्वच्छता राखली जात नाही. रेल्वे स्थानकासमोरील कारवार बसस्थानकाचे उद्घाटन करून आठ दिवस झाले नाहीत. तोच बसस्थानकाच्या आवारात कचऱयाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे या बसस्थानकाच्या स्वच्छता राखण्याच्यादृष्टीने आवश्यक उपाययोजना राबविण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत.
रेल्वे स्थानकाचा कायापालट करून स्मार्ट रेल्वे स्थानक बनविण्यात येत आहे. त्यामुळे येथील कॅन्टोन्मेट हद्दीत येणाऱया कारवार बसस्थानकाचा विकास स्मार्ट सिटी योजनेंतर्गत करण्यात आला आहे. या शहराच्या दक्षिण भागातील गावांना जाणाऱया बस या ठिकाणी थांबतात. तसेच गोवा, पणजी, कारवार, रामनगर, खानापूर, हल्याळ अशा विविध गावांना जाणाऱया बसदेखील याठिकाणी थांबतात. त्यामुळे या बसस्थानकाला कारवार बसस्थानक म्हणून ओळखले जाते. या बसस्थानकाची दुरवस्था झाल्याने प्रवाशांची गैरसोय होत होती. प्रवाशांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासह स्मार्ट बसस्थानक निर्माण करण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत निधीची तरतूद करण्यात आली होती. याअंतर्गत आसनव्यवस्था, निवारा शेड, परिवहन मंडळाचे कार्यालय तसेच व्यापारी गाळे निर्माण करण्यात आले आहेत. सदर प्रकल्प तयार झाल्यानंतर मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या हस्ते आठ दिवसांपूर्वी उद्घाटन करण्यात आले होते. पण आठ दिवसात बसस्थानकाची दुरवस्था झाली असून सर्वत्र कचऱयाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याठिकाणी ठेवण्यात आलेल्या खुर्च्या अस्ताव्यस्तपणे ठेवण्यात आल्या आहेत. पान-तंबाखू खाऊन थुंकण्यात आल्याने रस्ता खराब झाला आहे. आठ दिवसांपूर्वी लोकार्पण करण्यात आलेल्या बसस्थानकाची दुरवस्था झाली असून सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. सदर बसस्थानक कॅन्टोन्मेंट हद्दीत येत असून स्मार्ट सिटी कंपनीने बसस्थानक अद्याप कॅन्टोन्मेंट बेर्डकडे हस्तांतर केले नाही. त्यामुळे बसस्थानकाची स्वच्छता केली जात नाही. त्यामुळे बसस्थानकाची स्वच्छता कोण करणार, असा मुद्दा निर्माण झाला आहे. परिणामी बसस्थानकाच्या आवारात कचरा पसरला असून सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे.
उद्घाटन झाल्यानंतर सदर बसस्थानक कॅन्टोन्मेट बोर्डकडे हस्तांतर करणे आवश्यक आहे. पण अद्याप हस्तांतर करण्यात आले नसल्याने देखभालीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या बसस्थानकाच्या देखभालीकरिता हस्तांतरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची गरज निर्माण झाली आहे.