वार्ताहर / धामोड
फराळे (ता. राधानगरी) येथील ‘रिलायबल शुगर अँन्ड डिस्टलरी पॉवर’ या कारखान्याने चालू गळीत हंगामातील १५ जानेवारीनंतर गेलेल्या ऊसाची बीले अद्याप दिलेली नाहीत. आगामी आठ दिवसात हि बिले संबधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी. अन्यथा कारखान्यासमोर आंदोलन केले जाईल असे निवेदन तुळशी परिसरातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी आणि राधानगरी तहसिलदार यांना दिले आहे. निवेदनावर दीडशे शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.
निवेदनाचा आशय असा: तुळशी खोऱ्यातील शेतकऱ्यांनी फराळे कारखान्याला ऊस पुरवठा केला आहे. १५ जानेवारीनंतर गेलेल्या ऊसांची बिले अद्याप दिलेली नाहीत. थकीत बिलाबाबत कारखाना प्रशासनाला वारंवार निवेदन दिले आहे. मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे विकास सेवा संस्थेतील मागील देणी थकीत राहीली आहेत. या हंगामातील पिकांना खते मिळणे अवघड झाले आहे. संबधित शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. प्रशासनाने आठ दिवसात ऊस बिले जमा करावीत, अन्यथा अंदोलन छेडले जाईल. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला कारखाना प्रशासन जबाबदार असेल. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी दौलत देसाई व राधानगरी तहसीलदार मीना निंबाळकर यांना येथील शेतकऱ्यांनी दिले आहे.
यावेळी राधानगरी तालुका खादी ग्रामोद्योगचे उपाध्यक्ष भगवान खोत, धामोडचे माजी उपसरपंच बापूसो जाधव, सदस्य शिवाजी कुरणे, माजी सदस्य दगडू चौगले, दिपक भामटेकर, अनिल जाधव, आदी शेतकरी उपस्थित होते.