प्रतिनिधी/ वास्को
वास्कोतील अनेक विकास प्रकल्प गेली आठ वर्षे रखडलेले असून ते केव्हा पूर्ण होतील याचा खुलासा करण्यात यावा. प्रकल्प रखडत असल्याने प्रकल्पांच्या खर्चात वाढ होणार आहे. जनतेला भुर्दंड पडणार आहे. याची दखल सरकार व स्थानिक आमदारांनी घ्यावी व मुख्यमंत्र्यांनीही वास्कोतील प्रश्नावर लक्ष घालावे अशी मागणी माजी महसुलमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जुझे फिलिप डिसोजा यांनी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे घेतलेल्या पत्रकार परीषदेत वास्कोत 2012 सालापासून कोणताही विकास प्रकल्प आकाराला आलेला नाही असे स्पष्ट करून हाती घेण्यात आलेला प्रकल्पही पूर्ण झालेला नाही. त्यामुळे वास्कोत विकास कधी होणार असा प्रश्न जुझे फिलिप डिसोजा यांनी केला. आपल्या मंत्रीपदाच्या काळानंतर वास्कोत विकास झालाच नाही. 99 कोटींचा कदंब बसस्थानक प्रकल्प गेली अनेक वर्षे धुळ खात आहे. शहरातील मासळी मार्केटचाही पत्ता नाही. मुख्याधिकारी बंगल्याच्या ठिकाणी होणार असलेला सिगनेचर प्रकल्पही गेली अनेक वर्षे मार्गी लागलेला नाही. मांगोहिलच्या रस्त्याशेजार जलतरण तलाव होणार असल्याचे आमिष दाखवण्यात आले होते. परंतु तेसुध्दा प्रत्यक्षात आलेले नाही. आपल्या कारकीर्दीत आयएनएस गोमंतकच्या हद्दीत जलकुंभ उभारण्यात आला. परंतु लोकांना अजूनही सुरळीत पाणी पुरवठा होत नाही. हा विकास कधी होणार असे जुझे फिलिप म्हणाले. मासळी मार्केटसाठी आपण मदतीचा हात पुढे केला होता. परंतु काही झाले नाही. भाजी मार्केटचाही प्रश्न रेंगाळलेला आहे. काही प्रकल्पांसाठी मुरगाव पालिकेच्या तिजोरीत सरकारने पैसे जमा केले होते. मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नात लक्ष घालावे व वास्को शहराच्या विकासाला चालना द्यावी अशी मागणी त्यांनी केली. चिखलीतील सरकारी हॉस्पिटल हा गरीबांचा आधार असून या हॉस्पिटलच्या खासगीकरणाच्या हालचाली सुरू झाल्याचे ऐकू येत आहे. अशा प्रकारचा निर्णय घेताना या हॉस्पिटलचा लाभ घेणाऱया गरजू लोकांवर अन्याय होणार नाही याचीही खबरदारी घ्यावी अशी मागणीही जुझे फिलिप यांनी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अल्पसंख्यांक अध्यक्ष नझीर खान यांनी मुरगाव पालिका आणि राज्य सरकारचा निष्काळजीपणाच वास्कोतील खुंटलेल्या विकासाला जबाबदार असल्याचा आरोप केला. निधी उपलब्ध होऊनही पालिकेचा सिगनेचर प्रकल्प होऊ शकलेला नाही. ती जमीन भर शहरातील कोंडवाडा ठरलेली आहे. पालिकेने ती जमीन कोंडवाडा असल्याचे जाहीर करावे किंवा प्रकल्प तरी उभा करावा अशी मागणी त्यांनी केली. वास्कोत अनेक औद्योगिक आस्थापने आहेत. मात्र, आणिबाणीची परिस्थिती हाताळण्यासाठी कोणतेही व्यवस्थापन नाही व यंत्रणा नाही. मार्केटची परिस्थिती आरोग्याला घातक अशी आहे. अग्नीशामक दलालाही इमारत नाही. इथले मंत्री व आमदार काय करतात असा प्रश्न करून खान म्हणाले की विकासाच्या केवळ घोषणा केल्या जात आहेत. हाती घेतलेले कामही इथे पूर्ण होत नाही. पालिकेत केवळ गटातटाचे राजकारण चाललेले आहे. त्यांना विकास कामात रस नाही असे खान म्हणाले.
या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा अध्यक्ष प्रितम नाईक, मनोज नाईक, अमीनुद्दीन मुल्ला उपस्थित होते.