सायंकाळी 4 वा.पर्यंत विसर्जन आटोपले
प्रतिनिधी/ फोंडा
आडपई गावातील पाच दिवसांच्या गणपतींचे विसर्जन म्हणजे भव्य मिरवणूक व मोठा जल्लोष असतो. यंदा अगदी सामसूम वातावरणात काही मोजक्याच कुटुंब सदस्यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांनी गणपती बाप्पाला निरोप दिला. बुधवारी दुपारी 2.30 ते सायं. 4 वा. पर्यंत गावातील सर्व सोळाही कुटुंबातील गणपतींचे विसर्जन झाले.
आडपई गावात पाच दिवसांच्या गणपतीची विसर्जन मिरणूक संपूर्ण गोव्यात प्रसिद्ध आहे. दिंडी, फुगडय़ा व चित्ररथ देखावे असे या मिरवणुकीचे खास आकर्षण असते. या आनंद सोहळय़ात सहभागी होण्यासाठी राज्य भरातून भाविक गर्दी करतात. कोरोना महामारीमुळे ग्रामस्थांना व भाविकांना यंदा मिरवणुकीचा हा उत्साह व आनंद लुटता आला नाही. अनेक वर्षांच्या या परंपरेत खंड पडल्याने ग्रामस्थांबरोबरच त्यांच्या सग्यासोयऱयांचाही यंदा निरुत्साह झाला.
आडपई गावात घरोघरी गणपती न पुजता येथील पंधरा ते सोळा मोठी कुटुंबे एकत्र येऊन सामुहिकरित्या गणपती पुजतात. नोकरी व्यावसायानिमित्त विविध भागात स्थायिक झालेले ग्रामस्थ चतुर्थीचे पाच दिवस आवर्जून आपल्या मूळ घरी येतात. त्यामुळे संपूर्ण गाव गजबजून जातो. खुमणेभाटकर, कुर्डीकर, म्हार्दोळकर, वस्त, सकले मुळे, वयले मुळे, बोरकर, सोसेभाटकर, लोटलीकर, खांडेकर, महालक्ष्मी, पोकळे, श्री शिवंबा निवास आदी कुटुंबियांचा त्यात समावेश आहे. यंदा बहुतेक कुटुंबातील सदस्यांनी गावात मुक्काम करणे टाळले. केवळ गणपतीच्या दर्शनापुरती हजेरी लावली.
बुधवारी दुपारी उत्तर आरती झाल्यानंतर सर्व कुटुंबातील गणपती आपापल्या सोयीनुसार विसर्जनाला निघाले. काही मोजकेच सदस्य गणपतीसोबत होते. प्रथेनुसार येथील दत्त मंडपाजवळ होणाऱया सामुहिक आरत्याही झाल्या नाहीत. दुपारी 2.30 ते सायं. 4 वा. पर्यंत जुवारी नदीत गणपतींचे विसर्जन करुन ग्रामस्थ घरी परतले हेते.