दरदिवशी सुमारे तिनशे जण येतात : काणकोणातील सीमा भागांत वावर : कोरोनाबाबत धोक्याची सूचना
प्रतिनिधी / काणकोण
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू करण्यात आलेला असताना आणि पोळे चेकनाक्यावर कडक बंदोबस्त ठेवण्यात आलेला असताना कर्नाटकातून आडवाटेने दरदिवशी 200 ते 300 लोक गोव्यात प्रवेश करत असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. यासाठी काही स्थानिक व्यक्ती ठेकेदार पद्धतीने पैसे घेऊन काम करत असल्याचे दावे होत आहेत. त्यामुळे या आडवाटा बंद करण्याची गरज आता निर्माण झाली आहे. नपेक्षा गोव्यात कोरोनाची बिकट परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माजाळी-तिळमातीवरून पोळेपर्यंत होडीच्या साहाय्याने येऊन कर्नाटकातील लोक गोव्यात प्रवेश करतात. त्याशिवाय मुंडगेरी, कल्ले, तिर्वण हा मार्ग त्याचबरोबर बेला, मुडगेरी मार्ग आणि पोळे येथील चंद्रहास नाईक यांच्या बारजवळचा मार्ग यासाठी वापरण्यात येत आहे. मुडगेरी, बेला आणि मुडगेरी, तिर्वण या रस्त्यांवरून सहज दुचाकीच्या साहाय्याने येता येते. यापूर्वी मार्ली येथील काही महिलांनी मुडेगरीमार्गे गोव्यात घुसू पाहणाऱया काही जणांना हाकलून लावले होते.
आडवाटा बंद करण्याची गरज
पोळे चेकनाक्यावर जरी नाकाबंदी करण्यात येत असली, तरी जोपर्यंत या आडवाटा बंद केल्या जात नाहीत तोपर्यंत कर्नाटकातील लोकांचे गोव्यात येणे बंद होणे अशक्य असल्याच्या प्रतिक्रिया आता व्यक्त करण्यात येत आहेत. त्याचबरोबर पोळे चेकनाक्यावर तैनात करण्यात आलेल्या विशेष अधिकाऱयांनी गंभीरपणे हा प्रश्न लक्षात घ्यायला हवा असे मत व्यक्त करण्यात येत आहे.
दरदिवशी गोव्यात येतात किमान 400 लोक
सद्यपरिस्थितीत दिवसाला जवळजवळ 200 वाहनांतून मिळून एकूण 400 लोक पोळे चेकनाक्यावरून गोव्यात येतात. या व्यक्ती परत कधी जातात आणि त्या खरोखरच गरजेच्या आहेत की नाहीत याचा विचार झालेला नाही, असेही मत व्यक्त होत आहे.
चेकनाक्यावरील विशेष अधिकारी बदलले
लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून सुभाष पागी, दामोदर गावकर आणि अल्लाबक्ष या तीन अधिकाऱयांची विशेष अधिकारी म्हणून पोळे चेकनाक्यावर नियुक्ती करण्यात आली होती. त्याशिवाय पोलीस निरीक्षक राजेंद्र प्रभुदेसाई आणि अन्य अधिकाऱयांचा या पथकात समावेश होता. मिळालेल्या माहितीनुसार, काणकोण तालुक्यात एकूण 15 राजपत्रित अधिकारी असताना केवळ तीनच अधिकाऱयांची या नाक्यावर नियुक्ती करण्यात आल्याबद्दल सदर अधिकाऱयांनी कुरकुर केल्यानंतर त्यांची बदली करून नवीन सहा जणांची या नाक्यावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात नगरनियोजन खात्याचे जयदेव हळदणकर, रस्ता विभागाचे आझाद वेर्णेकर, इमारत विभागाचे आचारी, प्रदीप पेडणेकर, खोतीगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक गणपती नाईक आणि वीज अभियंता प्रशांत नाईक यांचा समावेश आहे.
मंत्र्यांचा वशिला लावण्याचा प्रयत्न
मिळालेल्या माहितीप्रमाणे, यापूर्वी कर्नाटकातून गोव्यात येऊ पाहणाऱया काही जणांनी मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांचा वशिला लावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र चेकनाक्यावरील अधिकाऱयांनी सदर व्यक्तींना गोव्यात प्रवेश दिला नव्हता. यापुढे देखील ज्या आडवाटा आहेत त्यावर सक्त देखरेख ठेवून अनोळखी व्यक्ती दिसल्यास अडविण्याची मोहीम पोलिसांना हातात घ्यावी लागणार आहे. त्यासाठी स्थानिक पोलीस कर्मचाऱयांचे बऱयापैकी साहाय्य होऊ शकेल, असे मत व्यक्त होत आहे.
पोळे येथील चेकनाक्यावरून : तिनशे वाहनांना प्रवेश कसा?
लोलयेचे पंच निशांत प्रभुदेसाई यांचा सवाल
प्रतिनिधी / काणकोण
कोरोना महामारीचा संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करतानाच गोव्यातील सार्वजनिक बसवाहतूक मागच्या 22 मार्चपासून पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे. पोळे चेकनाक्यावर कडक बंदोबस्त ठेवण्यात आलेला असला, तरी मागच्या दोन दिवसांचा हिशेब पाहता दिवसाला किमान 250 ते 300 मालवाहू वाहने या चेकनाक्यावरून गोव्यात प्रवेश करत आहेत, त्यांची खरीच गरज आहे काय, एवढय़ा वाहनांसाठी कोणी पास दिले, असा सवाल लोलये-पोळे पंचायतीचे पंच निशांत प्रभुदेसाई यांनी केला आहे.
या चेकनाक्यावर पोलीस, अबकारी खात्याच्या कर्मचाऱयांशिवाय तीन विशेष अधिकाऱयांची आळीपाळीने देखरेख ठेवण्यासाठी नेमणूक करण्यात आलेली आहे. स्वतः दीपक देसाई निरीक्षक म्हणून लक्ष देत आहेत. असे असताना कोणाच्या आशीर्वादाने हे सगळे चालते, असा सवाल प्रभुदेसाई यांनी केला आहे.
सुरुवातीचे काही दिवस या ठिकाणी सर्व बाबी कडेकोट निर्बंधांनिशी चालू होत्या. काणकोणचे आमदार इजिदोर फर्नांडिस, सरपंच शैलेश पागी, माजी सरपंच अजय लोलयेकर यांनी वारंवार चेकनाक्याला भेट देऊन कामावर असलेल्या कर्मचाऱयांना आवश्यक सूचना केलेल्या आहेत. चेकनाक्यावरून गोव्यात प्रवेश करणारी वाहने मालवाहू आणि जीवनावश्यक वस्तू घेऊन येणारी असली, माजाळी, हळगासारख्या भागांतून केळी, अननस, कलिंगडे घेऊन येणारी असली, तरी अधिकृत पास असल्यासच त्यांना प्रवेश दिला जायचा. त्यामुळे मागच्या दोन दिवसांत एवढय़ा मोठय़ा प्रमाणात वाहनांनी गोव्यात प्रवेश करणे ही धक्कादायक गोष्ट असल्याच्या प्रतिक्रिया सध्या समाजमाध्यमांवर उमटायला लागल्या आहेत.