बेरोजगार व वैदू यांची होणार नोंदणी
जठार यांच्या उपस्थितीत बैठक
प्रतिनिधी / दोडामार्ग:
आयुष मंत्रालयाच्यावतीने आडाळी येथे सुरू होणाऱया महाराष्ट्रातील एकमेव आयुर्वेदिक वनस्पती संशोधन केंद्राला गती मिळावी, यासाठी भाजपचे प्रदेश सचिव व माजी आमदार प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत गुरुवारी बैठक झाली. यावेळी रिसर्च सेंटरला गती मिळावी, यासाठीचे नियोजन व बेरोजगार तसेच वैदू यांची नोंदणी करून स्थानिकांना रोजगार मिळावा, या हेतूने ‘डाटा’ संकलित करण्याचे ठरविण्यात आले.
आडाळी ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या बैठकीत जठार यांच्या समवेत जि. प. उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, सरपंच उल्का गावकर, जि. प. चे माजी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, भाजप तालुकाध्यक्ष संतोष नानचे, सुधीर दळवी, कसई- दोडामार्ग नगरपंचायत उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य पराग गावकर, चंद्रशेखर देसाई आदी उपस्थित होते.
शेकडो जणांना रोजगार
यावेळी जठार म्हणाले, आडाळीतील या रिसर्च सेंटरमधून शेकडो तरुण- तरुणींना नोकरी मिळणार आहेत. त्यासाठी स्थानिक बेरोजगारांचा तपशीलवार डाटा आपल्याकडे उपलब्ध असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे जठार यांनी म्हापसेकर व नाडकर्णी यांना बेरोजगारांची यादी संकलित करण्याचे निर्देश दिले.
वैदूंनी संपर्क करावा!
आज आयुर्वेदाला प्रचंड महत्त्व आहे. आपला भाग आयुर्वेदाची खाण आहे. येथील वनस्पतींचे संशोधन झाल्यास जगाच्या नकाशावर आडाळीचे स्थान अधोरेखित होणार आहे. ग्रामीण भागात फार पूर्वीपासून गावठी औषध देणारे वैदू आहेत. त्यांना या वनस्पतीची अधिक जाण आहे. त्यांच्या ज्ञानाचा उपयोग होऊन दुर्मीळ खजिना प्राप्त व्हावा, या उद्देशाने रिसर्च सेंटरची त्यांना आता जोडण्यात येणार आहे. त्यामुळे जिह्यातील वैदूंना एकत्रित करण्यात येणार असून त्यांनी संतोष नानचे (9423818866), सुधीर दळवी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन जठार यांनी केले आहे.
लवकर सुरुवात व्हावी
यावेळी उपस्थित सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी आडाळी येथील केंद्र मंजूर झाले असले तरी त्याच्या कामाचा शुभारंभ लवकर व्हावा, अशी ग्रामस्थांची मागणी असून त्यामुळे सरकारने याबाबतची कार्यवाही करावी, अशी मागणी केली.