एकूण संख्या सोळावर : डामरे येथील एकाच कुटुंबातील चौघांचा समावेश : सहाजणांचे ‘मुंबई कनेक्शन’
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्ग जिल्हय़ात नव्याने आणखी आठजण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्हय़ात कोराना रुग्णांची संख्या 16 वर पोहोचली आहे. नव्याने सापडलेल्या आठ रुग्णांमध्ये कणकवली तालुक्यातील डामरे येथील एकाच कुटुंबातील चौघे, ढालकाठी येथील दोघे, वैभववाडी तालुक्यातील नाधवडे येथील एक आणि मालवण तालुक्यातील हिवाळे येथील एकाचा समावेश आहे. या आठपैकी दोघे रत्नागिरी जिल्हय़ातील लांजा येथून, एक ठाणे आणि पाचजण मुंबईहून आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली. जनतेने घाबरून जाऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
आठपैकी दोघे जिल्हा रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल होते, तर सहाजण संस्थात्मक विलगीकरणामध्ये होते. तरीही त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यात येत आहे. आरोग्य विभागामार्फत सर्व्हेक्षणही करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. आठपैकी सहाजणांचे मुंबई कनेक्शन आहे, तर दोघे लांजा येथून आलेले आहेत.
कोरोनाचे संकट देशात ओढावल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हय़ात 25 मार्चला पहिला कोरोना बाधित रुग्ण सापडला. त्यानंतर 11 मेपर्यंत कोरोना पॉझिटिव्ह आठ रुग्ण सापडले होते. त्यानंतर नवीन रुग्ण सापडले नव्हते. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हय़ात मोठय़ा प्रमाणात जिल्हय़ाबाहेरून लोक आल्याने कोरोनाचे रुग्ण निश्चितच वाढतील, अशी भीती व्यक्त होत होती. 19 मे रोजी कोरोना तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांचा अहवाल आल्यानंतर एकाच दिवशी आठजणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. जिल्हय़ात कोरोना नमुना तपासणीचे प्रमाण वाढविल्यास ही संख्या आणखी वाढू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. सद्यस्थितीत कोल्हापूर शासकीय महाविद्यालयामधून कोरोना नमुने तपासणी करून घेतले जात आहेत.
डामरे येथील एकाच कुटुंबातील चौघे
कणकवली तालुक्यात एकूण सहा कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. त्यातील डामरे गावातील चौघे रुग्ण असून हे चौघेही एकाच कुटुंबातील असून यामध्ये आई-वडील आणि त्यांचा मुलगा व मुलगी यांचा समावेश आहे. मुंबई येथून आल्यानंतर त्यांना कणकवली शासकीय विश्रामगृहावर संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले होते.
लांजा येथून आलेले दोघे
कणकवली तालुक्यातील ढालकाठी येथील दोघे रुग्ण आहेत. 46 वर्षीय महिला आणि तिचा 24 वर्षीय मुलगा या दोघांचा यात समावेश आहे. दोघेही रत्नागिरी जिल्हय़ातून लांजा येथून आले आहेत. त्यांना कणकवली भक्तनिवास येथे संस्थात्मक विलगीकरण केले होते.
हिवाळे येथील एक रुग्ण
मालवण तालुक्यातील हिवाळे येथील 39 वर्षीय तरुण कोरोना बाधित सापडला आहे. तो ठाणे येथून आलेला असून त्याला जिल्हा रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल केले आहे.
नाधवडे येथील एक रुग्ण
वैभववाडी तालुक्यातील नाधवडे येथील एका 65 वर्षीय महिलेचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. ती मुंबईतील प्रभादेवी येथून आली आहे. तिलाही जिल्हा रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. नव्याने सापडलेल्या आठही रुग्णांना आता आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यात येत आहे. तसेच सर्व आरोग्य यंत्रणा अलर्ट करण्यात आली असून आरोग्य खात्यामार्फत सर्व्हेक्षण सुरू करण्यात आले आहे. चाकरमान्यांची संख्या वाढल्याने स्वॅब कलेक्शनचेही प्रमाण वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱयांनी दिली.
आणखी दोघे कोरोना मुक्त
यापूर्वी सापडलेल्या आठ कोरोना बाधित रुग्णांपैकी पाच रुग्ण बरे होऊन कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. राहिलेल्या तीन रुग्णांपैकी आणखी दोन रुग्णांचे कोरोना नमुने फेरतपासणी अहवालात निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे आठपैकी एकच रुग्ण कोरोना बाधित आहे. तर नव्याने सापडलेले आठ रुग्ण मिळून सद्यस्थितीत जिल्हय़ात कोरोना बाधित नऊ रुग्ण आहेत.
कोरोनामुक्त झालेल्या दोन रुग्णांमध्ये देवगड तालुक्यातील वाडा येथील दोन युवतींपैकी एकीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे, तर नेरुर येथील युवकाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे आणखी दोन रुग्ण बरे होऊन कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना लवकरच डिस्चार्ज देण्यात येणार आहे, अशीही माहिती जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर यांनी दिली.
जनतेने घाबरून जाऊ नये – के. मंजुलक्ष्मी
जिल्हय़ात नव्याने कोरोना बाधित रुग्ण सापडले असले, तरी जनतेने घाबरून जाऊ नये. सर्व प्रकारच्या खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. आठही रुग्णांना जिल्हय़ात आल्यानंतर वेळीच संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यामुळे त्यांचा संपर्क फारच कमी लोकांशी आलेला आहे. त्यामुळे जनतेने घाबरून जाऊ नये. तसेच जे लोक होमक्वारंटाईन आहेत, त्यांनी कुणाच्याही संपर्कात येऊ नये. शासनाचे नियम पाळावेत आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱयांनी केले आहे.