प्रतिनिधी / बेळगाव
स्मार्ट सिटी योजना राबविण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर स्मार्ट रस्ता निर्माण करण्याकरिता मंडोळी रोडची निवड करण्यात आली. पण तीन वर्षे उलटली तरी रस्त्याचे काम अद्यापही अर्धवटच आहे. येथील अर्धवट असलेल्या रस्त्यांमुळे आणि स्मार्ट सिटी कंपनीच्या दुर्लक्षाचा फटका स्थानिक रहिवाशांना बसत आहे. आणखी किती दिवस अडचणींतून जायचे, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
स्मार्ट सिटी योजनेसाठी शहराची निवड झाल्यानंतर स्मार्ट रस्ते करण्यासाठी मंडोळी रोड आणि शिवबसवनगर येथील रस्त्याची निवड करण्यात आली. या दोन्ही रस्त्यांकरिता 25 कोटींच्या निधीची तरतूद करून स्मार्ट सिटी योजनेतील कामाचा श्रीगणेशा करण्यात आला. सुरुवातीलाच हाती घेण्यात आलेल्या रस्त्याचा विकास ठप्प झाला आहे. मंडोळी रोडच्या एका बाजूचे काँक्रिटीकरण करण्यात आले. पण दुसऱया बाजूचे काम तीन वर्षांनंतरही रखडले आहे. ठिकठिकाणी खोदण्यात आलेले खड्डे, चरी आणि रस्ते वाहनधारक आणि स्थानिक रहिवाशांना त्रासदायक बनले आहेत. स्थानिक रहिवाशांना ये-जा करण्यासाठी तात्पुरता रस्ता करण्यात आला आहे. रस्त्याच्या बाजूला गटारसाठी खोदण्यात आलेल्या चरी नागरिकांना धोकादायक बनल्या आहेत. काही ठिकाणी गटारींचे बांधकाम अर्धवट झाले आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम कधी पूर्ण होणार? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत हाती घेण्यात आलेल्या अन्य रस्त्यांचा विकास पूर्णत्वास आला आहे. पण सुरुवातीला सुरू करण्यात आलेल्या रस्त्याचे काम अद्यापही अपूर्णच आहे.
काँग्रेस रोड ते व्हॅक्सिन डेपोपर्यंत मंडोळी रोडचे काम पूर्ण झाले आहे. पण गटारीवरील झाकणे घालण्यात आली नाहीत. ठिकठिकाणी लोखंडी सळय़ा सोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे या सळय़ांचा धोका परिसरातील रहिवाशांना आहे. काही दुकानांमध्ये किंवा घरांमध्ये जाताना रस्ता ओलांडून जावा लागतो. पण ठिकठिकाणी उघडय़ावर असलेल्या लोखंडी सळय़ा अपघातास निमंत्रण देत आहेत. आता पुन्हा पावसाला सुरुवात झाल्याने या रस्त्याचे काम कधी पूर्ण होणार व निर्माण झालेल्या अडचणींचे निवारण कधी होणार असा प्रश्न येथील रहिवासी उपस्थित करीत आहेत. स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱयांकडे रस्त्याच्या पूर्ततेसाठी नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी केल्या. पण याची दखल घेतली गेली नाही. अधिकाऱयांच्या बेजबाबदार आणि दुर्लक्षामुळेच रस्त्याचा विकास ठप्प झाला आहे, असा आरोप नागरिक करीत आहेत.