-जिह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढतीच
प्रतिनिधी/ रत्नागिरी
मिरजवरून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिह्यात नव्याने रविवारी 13 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 145 इतकी झाली आहे. दिवसेंदिवस वाढती रुग्ण संख्या जिह्याची चिंता वाढवत आहे. दुसऱया बाजूला रविवारी सकाळी आणखी 6 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आतापर्यंत जिल्हय़ात डिस्चार्ज मिळालेल्यांची संख्या 42 झाल्याने दिलासा मिळाला आहे.
रत्नागिरी जिह्यात मुंबईतून आलेल्या चाकरमान्यांची संख्या सर्वाधिक असून त्यांना जिह्यात आल्यानंतर क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यामुळे याचा प्रसार गावात झाला नसला तरी योग्य ती खबरदारी गाव कृती दलाने घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात लवकरच स्वॅब चाचणी केंद्र सुरू होणार असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले असल्याने आरोग्य विभागाला दिलासा मिळाला आहे. ही प्रयोगशाळा नेमकी कधी सुरु होणार, याकडे आरोग्य अधिकाऱयांचे लक्ष लागून राहिले आहे.
रविवारी सकाळी 13 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये रत्नागिरी-रत्नागिरी 1, करबुडे 1, भोके 2, हरचेरी 1, लांजा- वाघ्रट 2, संगमेश्वर-निवे बुद्रुक 1, कळंबस्ते 1, मानसकोंड 1, राजापूर- मोहल्ला 1, चिपळूण- वाघिवरे 1, कळंबट 1 असे रूग्ण सापडले आहेत.
जिल्हय़ातील कोरोनाबाधितांचा वाढता आकडा पाहता अनेक ठिकाणी सोशल डिस्टंन्सिगची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा प्रशासनाने सोशल डिस्टंन्सिगबाबत कडक अंमलबजावणी करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
दीड वर्षाच्या मुलासह सहाजणांना डिस्चार्ज
रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोनाची संख्या वाढतीच असली तरी दररोज बाब बरे झालेल्या रुग्णांमुळे दिलासा मिळत आहे. रविवारी सकाळी आणखीन 6 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून यामध्ये एका 16 महिन्याच्या बालकाचाही समावेश आहे.
कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचारानंतर बरा होऊन घरी जाऊ शकतो. केवळ त्यांनी चांगला प्रतिसाद दिला पाहिजे, यासाठीच उपचारापूर्वी शासकीय रुग्णालयात समूपदेशन केले जाते. आतापर्यंत 42 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ही बाब जिह्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असल्याचे वैद्यकीय अधिकाऱयांचे म्हणणे आहे. एकीकडे रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. यामध्ये मुंबई प्रवास इतिहास असणारे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळे आणखीन काही दिवस रुग्ण संख्या कमी होणार नाही. आतापर्यंत 4 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे चारही जण उपचारासाठी उशिरा दाखल झाले होते. रविवारी सकाळी 6 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये 3 पुरुष, 3 स्त्राr रुग्णांचा समावेश आहे. साखरतर येथील 3 रुग्ण, मेर्वी 1, नाचणे 1 असे 6 रुग्ण बरे होऊन घरी परतल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
मोरवंडेत होम क्वारंटाईन वृद्धाची आत्महत्या
तालुक्यातील मोरवंडे-मोदगेवाडी येथील अंगणवाडीत होम क्वारंटाईन करण्यात आलेल्या 60 वर्षीय वृद्धाने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. अनंत भुवड असे मृत वृद्धाचे नाव आहे. या वृद्धास 22 मे रोजी नजीकच्या अंगणवाडीत होम क्वारंटाईन करण्यात आले होते. त्याच्या स्वॅबचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवले असता अहवालही निगेटिव्ह आला होता. मात्र तरीही वृद्धाने आत्महत्या केल्याने गावात खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे नेमके कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही. मात्र नैराश्येपोटी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.