पूर्व लडाखमध्ये चिनी सैन्याच्या हाती पुन्हा निराशा : बिथरून हवेत गोळीबार करण्याच्या घटना
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पूर्व लडाखमध्ये भारतीय सैन्याने आणखी सहा ठिकाणे पादाक्रांत केल्यानंतर चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) आणखी बिथरली आहे. दोन्ही देशांमधील लष्करी चर्चेची पुढील फेरी होऊ शकलेली नाही, कारण चीनने तारखेवर शिक्कामोर्तब केलेले नाही. त्यातच गेल्या तीन आठवडय़ांत भारतीय लष्कराने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या (एलएसी) परिसरातील उंचावरील सहा नवीन भाग गाठल्याने त्यांची आणखी गोची झाली आहे.
चिनी सैन्याची सुद्धा या पर्वतीय भागात पोहोचण्याची इच्छा होती, पण भारताने त्यांच्या आधीच ती ठिकाणे गाठण्याची हुशारी दाखविली. 29 ऑगस्ट ते सप्टेंबरच्या दुसऱया आठवडय़ादरम्यान भारतीय लष्कराच्या जवानांनी या सहा प्रमुख टेकडय़ांवर नजरेत भरू न देता नियंत्रण मिळविले.
भारताच्या यशाने चीन अस्वस्थ
वृत्तसंस्था ‘एएनआय’ने दिलेल्या माहितीनुसार, मगर हिल, गुरुंग हिल, रेचिन ला, रेजांग ला, मोखपरी आणि फिंगर-4 जवळच्या या सहा मोक्याच्या टेकडय़ा भारतीय लष्कराने आपल्या नियंत्रणात आणल्या आहेत. भारतीय सैनिक तेथे उपस्थित आहेत. सदर जागा खाली पडून होत्या आणि चिनी सैन्य तेथे पोहोचण्यापूर्वीच भारतीय सैन्याने रणनीतीच्या दृष्टीने यश मिळविताना त्या ठिकाणांचा कब्जा केला.
निराशेतून हवेत गोळीबाराच्या घटना
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उंचावरील ठिकाणी पोहोचण्यात अपयशी ठरल्याच्या चिनी सैन्याच्या निराशेतून बऱयाच दिवसांनी सीमेवर गोळय़ा उडाल्या. पँगाँग तलावाच्या दक्षिणेकडील काठाच्या परिसरात हवेत गोळीबाराच्या किमान तीन घटना घडल्या आहेत.
चीनने वाढविली जवानांची संख्या
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्लॅक टॉप आणि हेल्मेट टॉप हे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या पलिकडे आहेत. भारतीय सैनिक जेथे आहेत ते भाग ‘एलएएसी’च्या भारतीय भागात येतात. भारताने केलेल्या या कृतीनंतर चिनी सैन्याने रेजांग ला आणि रेचिन ला येथे 3 हजार अतिरिक्त जवान तैनात केले आहेत. यात पीएलएच्या इन्फंट्री आणि आर्म्ड युनिटच्या जवानांचा समावेश आहे. चिनी सैन्याच्या मोल्दो युनिटलाही पूर्णपणे सक्रिय केले गेले आहे. गेल्या काही आठवडय़ांमध्ये चिनी सैन्याने तैनात जवानांच्या संख्येत लक्षणीय वाढ केली आहे.
चीनच्या बाजूने संवादात कोणतीही सकारात्मक प्रगती झालेली नाही. चिनी सैन्याने वारंवार अतिक्रमण करण्याचे प्रयत्न केले आहेत. त्यानंतर भारतीय सैन्य निरंतर मोहिमा राबवून उंचावरील मोक्मयाची ठिकाणे गाठू लागले आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोबाल, तिन्ही संरक्षण दलांचे प्रमुख जनरल बिपीन रावत आणि लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे हे परिस्थितीवर देखरेख ठेवून आहेत.