नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोना संसर्ग कमी झाल्यानंतर अनेक राज्यांमधून होत असलेल्या मागणीमुळे भारतीय रेल्वेने आणखी 660 रेल्वे श्रेणीबद्ध पद्धतीने संचलित करण्यास मंजुरी दिली आहे. चालू आठवडय़ापासून या एक्स्प्रेस-मेल रेल्वे प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाखांच्या खाली आल्यामुळे आता बऱयाच राज्यांनी ‘अनलॉक’ची प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर आता व्यवहार सुरू होण्यासाठी रेल्वे विभागाने ठराविक मार्गांवर रेल्वे सेवा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रवाशांच्या आणि प्रवासी मजुरांच्या सोयीसाठी रेल्वे उपलब्ध करणे आणि विविध ठिकाणी जाण्यासाठी प्रतीक्षायादी संपवण्यासाठी विशेष रेल्वेंची संख्या वाढवण्यात येत असल्याचे स्पष्टीकरण रेल्वे मंत्रालयाने दिले आहे. भारतात कोरोना विषाणूच्या दुसऱया लाटेदरम्यान भारतीय रेल्वेने अनेक रेल्वेंचे संचलन थांबवले होते. मात्र आता सुधारत असलेली क्षेत्रीय रेल्वे विभागांतर्गतची तिकिटांची मागणी आणि त्या-त्या प्रदेशात कोरोना विषाणू संसर्गाची परिस्थिती विचारात घेऊन त्या भागात रेल्वेंचे संचलन श्रेणीबद्ध पद्धतीने करण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.