शाळेत असताना तरल वगैरे कविता वाचलेल्या आठवत नाहीत! यमक-अनुप्रासांच्या दागिन्यांनी मढवलेल्या कविताच अभ्यासक्रमात होत्या, आणि त्यातल्या अनेक कविता सरांच्या-बाईंच्या छडय़ांच्या भीतीने ‘पाठ कराव्या’ लागल्या होत्या. त्याकाळी ‘ऑफ तास’ किंवा ‘ऑफ पिरियड’ नावाचे प्रकरण होते. सर किंवा बाई गैरहजर असले की त्यांच्या ‘तासाला’ कवितांचे सामूहिक पठण होई. ‘देवा तुझे किती सुंदर आकाश’ ही तोंडपाठ झालेली पहिली कविता असावी. त्यानंतर ‘राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या’ या कवितेचा ‘नंबर’ लागतो. सदरहू कविता आम्ही ‘ओ रात के मुसाफिर चंदा जरा बता दे’ या गाण्याच्या चालीवर गात असू. हायस्कुलात गेल्यावर त्याच चालीवर आम्ही ‘प्रेमस्वरूप आई’ मुखोद्गत केली. इयत्ता चौथीतली ‘शर आला तो धावुनी आला काळ, विव्हळला श्रावणबाळ, हा आई गे, दीर्घ फोडुनी हाक, तो पडला जाऊनी झोक’ ही कविता अद्यापही बरीच लक्षात आहे. आठवीनंतर केव्हा तरी आचार्य अत्र्यांची ‘आजीचे घडय़ाळ’ ही शार्दूलविक्रीडित वृत्तातली कविता भेटली. शार्दूलविक्रीडित वृत्तातील कविता मंगलाष्टकांच्या चालीवर गाता येतात हा शोध कोणी लावला ते आठवत/माहीत नाही. राम गणेश गडकऱयांची ‘काही गोड फुले सदा विहरती स्वर्गांगनांच्या शिरी’ (एखाद्याचे नशीब) ही नितांत गंभीर आणि सुंदर कविता त्याच वृत्तात असल्याने ‘ऑफ तासाला’ मंगलाष्टकांच्या चालीवर आम्ही म्हटल्यावर ऐकणारे सर खिन्न खिन्न झाल्याचे आठवते.
नल-दमयंती आख्यानातील काही भाग अभ्यासाला होता. त्यातील ‘तदितर खगभेणे वेगळाले पळाले, उपवन जलकेली जे कराया मिळाले, स्वजन गवसता त्याजपाशी नसे तो, कठीण समय येता कोण कामास येतो’ या ओळी कोणत्याच चालीवर न म्हणता आजतागायत मुखोद्गत राहिल्या आहेत. त्यातील ‘टाकी उपानह पुढे अति मंद पायी, केली विजार वरी, डौरही मौन सेवी’ या ओळी सर वाचत असताना ‘केली विजार वरी’ या शब्दांपाशी फिस्सकन हसणाऱया सर्वांना सरांनी तास संपेतो उभे केले होते! गडकऱयांच्या ‘राजहंस माझा निजला’ या कवितेला आम्ही कोणतीही चाल लावली नाही. तिची थट्टा केली नाही. त्यातल्या ‘ते ह्रदय कसे आईचे, मी उगाच सांगत नाही, जे आनंदातही रडते, दु:खात कसे ते होई’ या ओळी ओठांवर आल्या तर आजही अंगावर काटा उभा राहतो.