ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी वाढती महागाई आणि कोरोना लसीचा तुटवडा या मुद्द्यावरून आज पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. जनता या गोष्टींमुळे संकटात आहे आणि केंद्र सरकार सोशल मीडियावर अंकुश लावण्यात आणि आपली खोटी इमेज चमकवण्यात व्यस्त आहे. याबाबत त्यांनी एक ट्विट केले आहे.
राहुल गांधी आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, केंद्र सरकारची प्राथमिकता – सोशल मीडिया आणि खोटी इमेज; आणि जनते समोर वाढती महागाई, कोरोना लसीचा तुटवडा… हे कसले अच्छे दिन!
दरम्यान, देशात एकीकडे कोरोना संकट वाढत असतानाच लोकांना महागाईचा सामना करावा लागत आहे. सरकारने संगितेलेल्या आकडेवारीनुसार, या महिन्यात खाद्य तेलाचे दर हे मागील एक दशकातील दरापेक्षा सर्वात जास्त आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत तेलाच्या किंमतीत सरासरी 19 ते 59 टक्के वाढ झाली आहे.
दुसरीकडे सरकारने सोशल मीडियासाठी नवीन डिजिटल कायदा लागू केला आहे. विरोधी पक्षाचा आरोप आहे की, सरकार नवीन कायद्याच्या माध्यमातून सोशल मीडियावर अंकुश लावण्याचा प्रयत्न करीत आहे. विरोधी पक्षाने आणखी एक आरोप करताना म्हणाले की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करताना अयशस्वी ठरलेले हे सरकार होणाऱ्या टीकेला त्रासले असल्याने, सोशल मीडियावर अंकुश लावण्याचा प्रयत्न करीत आहे. तसेच सरकार केवळ आपली इमेज सुधारण्याचा प्रयत्न करण्यावर भर देत आहे.