बेळगाव :
…आणि त्यांच्या डोळय़ातून अश्रू वाहू लागले… गेलेली व्यक्ती ना त्याच्या रक्ताची ना नात्याची… तरीदेखील स्मशानभूमीत त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना महानगरपालिकेच्या आरोग्याधिकाऱयांच्या डोळय़ातून अश्रू वाहू लागले…. हे कोणत्या जन्मीचे ऋणानुबंध हे मला माहिती नाही. तथापि, अंत्यसंस्काराची जबाबदारी आमच्यावर यावी यामागची दैवगती काय आहे हे मला माहिती नाही, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली.
हे अधिकारी म्हणजे महानगरपालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. बसवराज दबाडे. कोरोनाग्रस्तांपासून कोसो मैल दूर राहण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करतो आहे. दुर्दैवाने कोरोनामुळे मृत्यू आल्यास दुर्दैवच. काही ठिकाणी नातेवाईक त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचे टाळतात. काही ठिकाणी नातेवाईकांची इच्छा असूनही समाज त्यांना त्यापासून दूर ठेवतो. अशा वेळी ही जबाबदारी महानगरपालिकेच्या अधिकाऱयांवर येऊन पडते.
कोरोनामुळे मृत्यू आल्यानंतर त्याची जबाबदारी महानगरपालिकेकडे सोपविली जाते. मृत व्यक्तीचे अंत्यसंस्कार महानगरपालिकेलाच करावे लागतात. गुरुवारी कोरोनामुळे दोन मृत्यू झाले. सदाशिवनगर स्मशानभूमीत त्यांच्यावर मनपाच्यावतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत व्यक्ती नात्यातील असूनसुद्धा नातेवाईक अंत्यसंस्कार न करता ती जबाबदारी आमच्यावर देत आहेत आणि कोणताच रक्तसंबंध किंवा नातेसंबंध नसताना आम्हाला हे अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. हा कोणता ऋणानुबंध आहे, अशा भावना डॉ. बसवराज दबाडे यांच्या मनात दाटून आल्या आणि स्मशानभूमीत त्यांना अश्रू अनावर झाले.