आम्ही ज्या शाळेत शिकलो त्या शाळेतल्या एका तुकडीसाठी रावळगाव हे नाव वेगळय़ा कारणामुळे स्मरणात आहे. साठ-सत्तरच्या दशकात रावळगावचं नाव घेतलं की तिथे तयार होणारी स्वस्त आणि मस्त चॉकलेटे डोळय़ांसमोर येत. चॉकलेटे वाजवीपेक्षा अधिक गोड असत, चावायला जरा कठीण. पण तोंडात टाकली की हळू हळू विरघळत जात. ते असो.
1967 ते 1970 या काळात आम्ही आठवी ते अकरावीत होतो. श्याम अत्रे नावाचे वर्गशिक्षक होते. ते इंग्रजी शिकवीत. गमतीदार योगायोग म्हणजे अत्रे सरांचे मूळ गाव रावळगाव होते. ही गोष्ट आम्हाला बहुधा दिवाळीच्या उंबरठय़ावर समजली. आठवीत असताना इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकात पत्रलेखनावर एक धडा होता. आठवीत येईतोवर मराठी-हिंदी-इंग्रजीत आम्ही मित्रास पत्र, वडिलांस पत्र, मोठय़ा भावास पत्र. छोटय़ा भावास उपदेशपर पत्र किंवा बडे भाई को पत्र किंवा लेटर टू अमुकतमुक अशी अनेक पत्रे परीक्षेत लिहिली होती. दिवाळीच्या सुट्टय़ा जवळ येऊन ठेपल्या होत्या. सर्वांना सणाचे वेध लागले होते. तर एकूण एक शिक्षक आणि शिक्षिकांना सुट्टीसाठी विद्यार्थ्यांवर भरपूर गृहपाठ लादण्याचे वेध लागले होते. सहामाही परीक्षेत कमी मार्क्स मिळालेल्या मुलांसाठी सुट्टीच्या काळातच शाळेने ज्यादा तास नावाचे संकट उभे केले होते. पण आम्हाला त्याची भीती नव्हती. आमचा वर्ग बऱयापैकी हुशार होता. सहामाहीत कोणी नापास झाले नव्हते. मुख्य म्हणजे आमचे वर्गशिक्षक अत्रे सर सुट्टीत त्यांच्या गावी जाणार होते. त्यांचे गाव रावळगाव आहे हे आम्हाला तेव्हा समजले. सरांनी सुट्टीसाठी आम्हाला सोप्पा आणि ऐच्छिक ‘टास्क’ दिला. सुट्टीत आम्ही सरांना इंग्रजीत पत्र लिहायचे होते. आमच्या कोणत्याही पाठ्यपुस्तकात गुरुजींस पत्र, शिक्षक को पत्र किंवा लेटर टू टीचर नव्हते. त्यामुळे या पत्राचा मजकूर आम्हाला कुठे आयता उपलब्ध नव्हता. तरी मी माझ्या इंग्रजीत एक पत्र लिहिले आणि रावळगावच्या पत्त्यावर धाडले. सुट्टी संपण्याआधी सरांचे मराठीत उत्तर आले. सुट्टी संपल्यावर शाळा सुरू झाली तेव्हा लक्षात आले की अनेक मुलांच्या दप्तरात सरांनी पाठवलेली उत्तरे होती. या पत्रलेखनाचा सराव मला छान कामी आला. त्याच वषी मी ना. सी. फडके यांना एक अनाहूत पत्र लिहिले आणि त्यांचे उत्तर आल्यावर ते अभिमानाने मिरवले. त्आयुष्यात पहिल्यांदा छापून आलेले माझे नाव मार्मिकमध्येच! विदेशी पत्रमित्रांना इंग्रजीत सफाईदार पत्रे लिहायला सुरुवात केली. शाळेत असताना आमच्यातील कोणीच कधी सरांना रावळगावहून येताना चॉकलेटे आणण्याची विनंती केली नाही, याचे नवल वाटते!