बरोबर 46 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी देशाच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली होती. सत्तेचा निरंकुश वापर करून इंदिराजींनी आणीबाणीला विरोध करणाऱया तीन लाख लोकांना तुरुंगात टाकले. व्यक्ती स्वातंत्र्यावर आणि वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्यावरही गदा आणली. असा काळ देशात पुन्हा कधी येऊ नये म्हणून लोकांनी दिलेल्या लढय़ाचे स्मरण केले जाते. आणीबाणीबाबत जसे आक्षेप आहेत त्याच पद्धतीने आणीबाणीचे समर्थन करणारेही मोठय़ा संख्येने आहेत. विशेषतः इंदिरा गांधींचे पुत्र संजय गांधी यांनी राबवलेल्या नसबंदी मोहिमेचे समर्थन करणारे अगदी काँग्रेसच्या कट्टर विरोधकांमध्येही आढळतात. आजही अनेकदा संजय गांधी यांच्या त्या धोरणाची आठवण सांगणारे आणि त्याचे कौतुक करणारे, ज्येष्टत्वाकडे झुकलेले कार्यकर्ते भेटतात. मात्र आणीबाणीतील अंदाधुंद कारभार बहुतांश लोकांना मान्य नसतो. 21 महिन्याचा तो कालखंड. मात्र त्याचा प्रभाव जगातील सर्वात मोठय़ा लोकशाहीच्या मानसिकतेवर आहे. अशाप्रकारे आणीबाणी पुन्हा कधीही लागू नये याची तरतूद घटनेने केलेली असली तरीसुद्धा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या हे राष्ट्र कधीही हुकूमशहांच्या ताब्यात जाऊ नये याची काळजी जनताच घेताना दिसते. भारतात अती लोकशाही आहे अशी तक्रार करणारे महाभाग सर्व सत्ताकाळात उगवतात आणि अंधारात लुप्तही होतात. भारतीय लोकशाहीने अशा प्रकारचे अनेक हल्ले पचवले, सत्तांतरे घडवली. मात्र ती सगळीच लोकशाहीच्या मार्गाने. भारताबरोबरच स्वतंत्र झालेला शेजारचा पाकिस्तान अथवा भारतीय उपखंडातील इतर राष्ट्रे असोत ते काही कारणांमुळे हुकूमशहा, लष्करशहांच्या किंवा राजेशाहीच्या ताब्यात गेलेली आढळतील. भारत मात्र शहरापासून कडेकपाऱयात राहणाऱया सुज्ञ नागरिकांच्या मतदानाच्या जोरावर या देशात विविध विचारांच्या सत्ता घडवत आणि बदलत आला आहे. अर्थात यंत्रणेला वेठीस धरून आणि अल्पमताचे, बहुमताचे खेळ करून प्रत्येक राजवटीत काही बरे, काही वाईट निर्णय झाले. मात्र ते बदलण्यासाठी त्या त्या वेळच्या जनतेने सुज्ञपणाने मतदान करून आपल्याला हव्या असणाऱया विचारांची सत्ता या देशात आणून दाखवली आहे. सर्वसामान्यांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करू शकेल अशा नेतृत्वावर आणि राजकीय पक्षांवर विश्वास दाखवत जनतेने अपेक्षेने मतदान केले. त्या अपेक्षा पूर्ण होईपर्यंत त्याच राज्यकर्त्यांना सत्तेवर बसवले. त्यांचे निर्णय चुकत असतील तर वेळोवेळी निवडणुकांमध्ये त्या राज्यकर्त्यांना समज मिळेल अशा पद्धतीने विरोधी मतदान करून सत्ता विरोधी विचारांनाही बळ दिले. त्यातूनही न सुधारलेल्या राज्यकर्त्यांना सत्ताभ्रष्ट केले आणि नव्या राज्यकर्त्यांना सत्तेवर आणले! मध्यंतरीच्या काळात तर कोणत्याही राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत न देता आघाडीच्या राजकारणाचा खेळ करण्याची वेळ राज्यकर्त्यांवर जनतेने आणली. परिणामी प्रत्येक निर्णयासाठी बहुमताची चाचपणी करत आणि देशातील जनतेचा विचार घेत राज्यकर्त्यांना काही निर्णय घ्यावे लागले. या दरम्यान प्रादेशिक नेतृत्वाचेही महत्त्व वाढले, त्यानंतरच्या काळात प्रादेशिक शक्ती आपल्याला मिळालेल्या संधीचा चुकीचा वापर करत आहेत हे लक्षात आल्यानंतर एकाच पक्षाला जास्त जागा देऊन सत्तेच्या जवळ जाण्याची मात्र तरीही इतर साथीदार पक्षांवर अवलंबून सत्ता स्थापन करण्याची वेळ देशातील जनतेने आणली. काहीवेळा काही आश्वासनांना आणि कृतीला पसंती दाखवत एकापेक्षा जास्त वेळा सत्ता सोपवली. आणीबाणीच्या काळाची आठवण काढताना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका लेखांमध्ये म्हणतात, ‘भ्रष्टाचाराची जागोजागी बजबजपुरी पण त्याबद्दल बोलण्याची कुणाची सोय नव्हती. प्राथमिक सोयी सुविधांचा अभाव पण दाद मागायची सोय नाही, आणीबाणीच्या काळात घटनादुरुस्तीचा सपाटाच लावण्यात आला, 38 व्या घटनादुरुस्तीने आणीबाणीला आव्हान देणेही अशक्मय झाले. 21 महिन्यांच्या कालखंडात जनमानसावर सूड उगवण्याचे काम झाले. पण जगणे म्हणजे केवळ दोन वेळचे जेवण नाही ही जाणीव रुजवत त्याकाळच्या नेत्यांनी या परिस्थितीवर मात केली. लोकशाहीची पुनःस्थापना झाली….!’ फडणवीस यांचे म्हणणे जितके खरे तितकेच, जनता पक्षाची राजवट जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू शकली नाही तेव्हा त्याच जनतेने पुन्हा एकदा सन्मानाने इंदिरा गांधींच्या हाती सत्ता सोपवली हेही तितकेच सत्य! देशाने अशा पद्धतीने नेहरूंपासून वाजपेयींपर्यंत आणि नरसिंहराव, मनमोहन सिंग यांच्यापासून नरेंद्र मोदींपर्यंत प्रत्येकातील चांगल्या शक्तीचा देशकार्यासाठी कसा सदुपयोग होईल हे पाहून त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारला मतदान आणि प्रोत्साहन दिले. भारतीय जनतेने शहाणपणाने या देशाला विविध टप्प्यांवर त्या-त्या प्रकारचे नेतृत्व मिळवून दिले. त्यांच्याकडून आपल्याला हवे तसे निर्णय मिळवले. मनमोहन सिंग यांच्या दहा वर्षांच्या कारकिर्दीनंतर लोकांनी नरेंद्र मोदी यांच्याकडे सलग दोन वेळा देशाची धुरा सोपवली आहे. सत्तेवर आल्यानंतर मोदी यांनी केलेल्या कृषी कायदे, कामगार कायदे, भूसंपादनाच्या कायद्यांना जनतेने विरोध सुरू केला आहे. हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्याच्या विरोधात सात महिन्यांपासून तळ ठोकून आहेत. आज आपल्या प्रश्नांसाठी ठिकठिकाणी त्यांचे मोर्चे निघणार आहेत. भारतीय जनतेची ही झुंझार वृत्ती या देशातील लोकशाहीला बळकट करत आलेली आहे. एका बाजूला राज्यकर्त्यांच्या प्रभावात राहायचे मात्र त्याचवेळी त्यांच्या न पटलेल्या निर्णयाविरोधात आंदोलन करायचे. भारतीय जनतेच्या अंगी असणारे हे धाडस हीच भारतीय लोकशाहीची खरी शक्ती आहे. आजच्या दिवसाच्या निमित्ताने या लोकशक्तीचा जयजयकार करत कोणतीही सत्ता कुठल्याही काळात निरंकुश होऊ नये, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आणीबाणीचा सामना करावा लागू नये इतका जनतेचा धाक सर्व काळातील सत्ताधीशांच्या मनात रहावा याच आजच्या दिनाच्या सदिच्छा.
Previous Articleआजचे भविष्य 26-06-2021
Next Article अजीर्ण झाले तर जेवण विषासारखे
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.