बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटच्या भाजप मंत्र्याने सध्याच्या भारतीय महिलांना एकटं रहायचंय, त्यांना मुलं नकोयत असं विधान केलं आहे. त्यांनी “मला हे सांगताना खेद वाटतोय पण आधुनिक भारतातील महिलांना एकटं राहायचंय. तसेच ज्या लग्न करतात त्या लग्नानंतरही बाळाला जन्म द्यायला तयार नाहीत. त्यांना सरोगसीद्वारे मुले हवी आहेत, विचारात बदल व्हायला पाहिजे पण तो असा असणं चांगलं नाही,” असं वक्तव्य कर्नाटकचे आरोग्य मंत्री डॉ. के. सुधाकर यांनी रविवारी केलंय. ते राष्ट्रीय मानसिक आरोग्य आणि न्यूरोलॉजिकल सायन्सेस संस्थेत (NIMHANS) जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त बोलत होते. सुधाकर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद उद्धवण्याची शक्यता आहे.
के. सुधाकर बोलताना या विचारांना भारतीय समाजावर पाश्चिमात्य प्रभाव असल्याचं म्हटलंय. तसेच आजकाल अनेक लोक त्यांच्या पालकांना त्यांच्यासोबत ठेवू इच्छित नाहीत. दुर्दैवाने आज आपण पाश्चिमात्य मार्गाने जात आहोत. आम्हाला आमचे पालक आमच्यासोबत राहायला नको आहेत. पालकच नको असल्याने आजी -आजोबा सोबत राहण्याबद्दल तर तुम्ही विसरुनच जा, असंही ते म्हणाले.
भारतातील मानसिक आरोग्याबद्दल बोलताना सुधाकर म्हणाले की, “प्रत्येक सातव्या भारतीयाला कोणती ना कोणती मानसिक समस्या असते. जी सौम्य, मध्यम आणि गंभीर असू शकते. तसेच तणाव व्यवस्थापन ही एक कला आहे. त्यामुळे तणाव कसा हाताळावा हे भारतीयांनी शिकण्याची गरज नाही, तर ती जगाला शिकवण्याची गरज आहे,” असंही त्यांनी सांगितलं.
“तणाव व्यवस्थापन ही एक कला आहे. ही कला आपण भारतीय म्हणून शिकण्याची गरज नाही. तणाव कसा हाताळावा हे आपल्याला जगाला सांगण्याची गरज आहे, कारण योग, ध्यान आणि प्राणायाम ही अद्भुत साधने आपल्या पूर्वजांनी हजारो वर्षांपूर्वी जगाला शिकवली होती. करोना काळात अनेक लोक त्यांच्या जवळच्या आणि प्रियजनांच्या शरीराला स्पर्श करू शकले नाहीत, ज्यामुळे मानसिक त्रासात वाढ झाली,” असंही ते म्हणाले.