तीन आठवडय़ांनंतरही जिल्हय़ातील 9 ते 12 वीच्या शाळांतील स्थिती : जिल्ह्य़ात 349 शाळा सुरु
प्रतिनिधी / रत्नागिरी
नववी ते बारावीच्या शाळा सुरू होऊन तीन आठवडे झाले तरी विद्यार्थी उपस्थिती शाळांमध्ये अजूनही ‘फुल्ल’ झालेली नसल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातील शाळांमध्ये ही उपस्थिती प्रकर्षाने जाणवते आहे. रत्नागिरी जिह्यातील 349 शाळा सुरू झाल्या असून एकूण 82 हजार 79 विद्यार्थ्यांपैकी आतापर्यंत 25 हजार 971 विद्यार्थ्यांनी शाळेत आपली हजेरी लावली आहे.
जिल्हय़ात इ. 9 ते 12 वी पर्यंतच्या एकूण 454 शाळा आहेत. कोरोनामुळे शासकीय नियमावलींचे पालन करून 23 नोव्हेंबरपासून या इयत्तांचे वर्ग सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. सुरूवातीला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद अल्प लाभला असला तरी आता चांगला प्रतिसाद लाभू लागल्याचे चित्र सध्या जिल्हय़ात दिसून येत आहे. मार्चपासून शाळा बंद होत्या. नवीन शैक्षणिक वर्षात शाळा सुरू न करता ऑनलाईन व जिथे इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही, तिथे ऑफलाईन अध्यापन करण्यात येत होते. शाळा सुरू झाल्यानंतर सुरूवातीला बहुतांश पालकांनी पाल्यांना शाळेत पाठवण्यास नकार दर्शवला होता. मात्र आता शाळांचे कामकाज सुरू झाल्यानंतर 23 नोव्हेंबरला पहिल्या दिवशी 204 शाळा सुरू झाल्या व 7 हजार 917 विद्यार्थी उपस्थित होते.
गेल्या आठवडय़ात 256 शाळा सुरू होऊन अल्प असणारी विद्यार्थी संख्या 12 हजार 845 इतकी पोहोचली. मात्र या आठवडय़ात उपस्थितीत पुन्हा वाढ झाल्याचे माध्यमिक शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. जिह्यातील एकूण 454 पैकी 349 शाळा सुरू झाल्या आहेत. पहिल्या दिवसापेक्षा विद्यार्थी उपस्थितीत वाढ झाली असून 25 हजार 971 विद्यार्थी शाळेत उपस्थित राहत आहेत. अजूनही 56,108 विद्यार्थी शाळेत हजर होणे बाकी आहेत.
जिह्यातील कोरोनाची संख्या कमी झाल्याने आता पालकही पाल्यांना शाळेत पाठवण्यास समंती देऊ लागले आहेत. शाळेत येणाऱया प्रत्येक विद्यार्थाच्या पालकांनी संमत्तीपत्र दिली आहेत. दररोज शाळेत येणाऱया विद्यार्थ्यांना सॅनिटायझर देवून तापमान व ऑक्सीजन तपासणी केली जात आहे. बैठक व्यवस्था एका बेंचवर एक विद्यार्थी व झिकझॅक पध्दतीने करण्यात येत आहे. विद्यार्थी वर्गात आल्यानंतर सलग 4 तासानंतरच त्यांना घरी सोडण्यात येत आहे. फक्त पाण्याची बाटली आणण्याची परवानगी देण्यात आली असून मास्क वापरणे सक्तीचे केले आहे.
- नववी ते बारावी एकूण शाळाः 454
- सुरू झालेल्या शाळाः 349
- एकूण विद्यार्थी संख्याः 82079
- एकूण विद्यार्थी उपस्थिती संख्याः 25971
- एकूण शिक्षक संख्याः 4281
- कोरोना चाचणी झालेले शिक्षक : 4277
- शिक्षकेतर कर्मचारी संख्याः 1384
- कोरोना चाचणी कर्मचारी संख्याः 1381
- कोरोना पॉझिटिव्ह शिक्षकः 12
- कोरोना पॉझिटिव्ह कर्मचारीः 3
पालकांची संमती वाढलीय
सुरूवातीला नकार दर्शवणाऱया पालकांनी मुलांना शाळेत पाठवण्यास सुरूवात केली आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळांमध्ये आवश्यक त्या प्रतिबंधात्मक सुविधा व खबरदारी घेतली जात असल्याने पालकांची संमती वाढली आहे. सलग 4 तास घेवून शाळा सोडण्यात येत आहेत. पालकाच्या विश्वासामुळेच शाळांच्या संख्येत वाढ होऊन उपस्थितीही सुधारण्यास मदत होईल, असा विश्वास जि. प. माध्यमिक शिक्षण विभागाकडून व्यक्त केला जात आहे.