ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे आता अजामीनपात्र गुन्हा ठरणार आहे. केंद्रीय मंत्रीमंडळांच्या बैठकीत आज याबाबतचा अध्यादेश काढण्यात आला असून, तो राष्ट्रपतींच्यामान्यतेनंतर लागू केला जाणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत आरोग्य कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचेही मुद्दे मांडले गेले. केंद्रीय मंत्रिमंडळाने याची तात्काळ दखल घेतली. या बैठकीत आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे आता अजामीनपात्र गुन्हा ठरणार असल्याचा अध्यादेश काढण्यात आला.
जावडेकर म्हणाले, यापुढे डॉक्टर किंवा आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ले झाल्यास संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येईल. यासाठी एक अध्यादेश काढण्यात आला असून, तो राष्ट्रपतींच्यामान्यतेनंतर लागू केला जाईल. आता वैद्यकीय पथकावर हल्ला केल्यास 3 महिन्यांपासून 5वर्षांपर्यंतची शिक्षा होणार आहे. तसेच 50,000 ते 2 लाख रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो.जर गंभीर नुकसान झाले तर 6 महिन्यांपासून 7 वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. तसेच 1 लाख ते 5 लाखरुपये दंड करण्याची तरतूद करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.