चकवा’ नावाच्या एका सिनेमातला गहनगूढ अंधारलेला सीन.. भोवताली फिरणाऱया जगातल्या त्याहून बिकट समस्या दर्शविणाऱया अंधारवाटा दाखवणारे सीन्स सरकत राहतात आणि सर्वांवर कडी म्हणजे एका अत्यंत ताकदवान कवितेचे स्वर कानावर आदळत राहतात. त्यात काय नसतं? अशी वेळ आहे की आता थोडय़ा वेळाने पहाट होईल, मग हळूहळू दिवस उजळत जाईल आणि उजेड येईल. कारण दिवस रात्रीचे चक्र चालू आहे. पण उजाडेल याची वाट पाहून थकलेल्या मनाचे काहीसे उद्विग्न उद्गार निघतात. अजून उजाडत नाही गं, अजून उजाडत नाही गं.. नाही गं……त्या पार्श्वभूमीच्या व्यक्तीच्या मनात आपण काही करू शकत नसल्याची खंतही आहे. आपल्याकडून काही घडत नसल्याचे शल्य आहे आणि जे चालले आहे ते बदलतच नसल्याची वेदना आहे. भयंकर वेदना!
दशकामागुन सरली दशके, अन् शतकाच्या वाटा गं.. ना वाटांचा मोह सुटे अन् ना मोहाच्या वाटा गं..ही ती वेदना आहे. गाणं या वळणावर एकदम सर्वस्पर्शी होतं. एखाद्या रात्रीत जसे तासामागून तास सरतात आणि काळोख मात्र तसाच घनगर्दच राहतो. तशाच या पहिल्या दोन ओळी. दशकामागून सरली दशके, पण काही उपयोग नाही. कारण या वाटेवर उजेड असेल किंवा उगवतीची ही वाट असेल असे समजून कित्येक मुसाफिर वाटा तुडवत आले आहेत. त्याचा परिणाम म्हणून ते अशा जंगलात जाऊन अडकतात ज्या जंगलाची जमीन असूर्यस्पर्शा आहे. म्हणजे अख्ख्या जगाला सूर्यदर्शन झालं तरीही ते उजेडापासून वंचितच राहतात. रस्ताच चकव्याचा असतो ना? परिणाम हा होणारच ना? मग पथ चकव्याचा गोल सरळ वा कुणास उमगत नाही गं, प्रवास कसला? फरफट अवघी, पान जळातुन वाही गं.पाण्यात पडलेलं पान जसं पुढे जाण्यासाठी फक्त आणि फक्त त्या पाण्यावर अवलंबून असतं. ना त्याला झाडाचा आधार उरलेला असतो ना हवेचा उपयोग राहिलेला असतो. फक्त प्रवाहपतित आयुष्य त्याच्या नशिबी असतं. अशा प्रकारची गाणी खूप आहेत पण सध्या हळूहळू मावळू लागलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे गाणे प्रकर्षाने आठवत राहते. भयंकर महामारीने अख्खे जग धराशायी होऊ घातले होते. किडय़ामुंगीसारखीच माणसं मरत होती. बाहेर पडायचीही प्रचंड धास्ती माणसाने घेतली होती. अजूनही ती आहेच. या सर्व कहारात प्रत्येक माणूस वाट पाहत आहे ती या भयंकर आजारावर मात करण्यासाठी असलेल्या लसीची. ती पाहता पाहता पूर्ण वर्ष सरलं पण अपेक्षित परिणाम काही साधला नाही. आणि अजूनही चकवा लागल्यासारखी माणसं हिंडत आहेत, आधार शोधत आहेत किंवा कोरोनाच्या वरवंटय़ाखाली भरडत आहेत. हे गाणे या सर्व घडामोडींचे प्रतीक आहे. हे गाणेही अशा वेळेचे वर्णन करते की जेव्हा ब्राह्ममुहूर्ताच्या किंचित आधीची वेळ आहे. सर्वत्र गूढ अंधार भरून राहिला आहे. उजाडेल याची जाणीव आहे पण अजून खूप वेळ आहे. तोवर धीर धरवत नाही. कारण अंधार असणे अटळ आहे. पण जेव्हा उजेडाची गरज असते तेव्हा एकेक क्षण मोठा वाटत असतो. हे गूढपण, ही पोकळी, रिता भवताल आणि आयुष्यातल्या काळय़ा बाजूचे कायमचे अस्तित्व दर्शवणारे हे गीत आहे संदीप खरे यांचे. ते स्वरबद्ध केले आहे डॉ सलील कुलकर्णी यांनी आणि त्यांनीच ते गायलेही आहे.. खरंतर हे गाणे ‘सांग सख्या रे’ या अल्बममधील आहे. पण ‘चकवा’ या सिनेमात ते घेतले आहे. अतुल कुलकर्णी आणि दीपा परबवर चित्रित झालेले हे गाणे आणि त्यातला त्या दोघांचाही मुद्राभिनय परिणामकारक वाटतो. अतुलसारखा ग्रेट अभिनेता त्या गाण्याला अपेक्षित असलेला थंड, विचारमग्न भाव आणि आतून असलेली दाहकता बेहद्द सुरेख रंगवतो. आणि गाणे एवढे प्रभावी वाटते ते अहिर भैरवावर आधारित आहे. उजेडाआधीचा अंधार दर्शवणारा भैरव हा एखाद्या निबिड अरण्याप्रमाणे अगम्य! इहतत्त्व आणि परतत्त्व यामध्ये जोडणारा काहीतरी धागा आहे. जगाच्या दिवसभराच्या अनावश्यक आवाजात त्याचे अस्तित्वच जाणवत नाही. पण या अशा वेळी त्याचे अस्तित्व जोरकसपणे जाणवते. उषःकालीन रागातल्या या गूढदर्शक रागात रिषभ धैवत निषादाची रचनाच अशी आहे की त्यातून खिन्नता, आक्रंदन, आस इतकी दिसत राहते की शब्दांशिवायही ते दिसू शकेल तर समर्पक शब्दरचनेची जोड मिळाल्यावर ते जबरदस्त होते यात शंकाच नाही. हे गाणे जे काही आपल्याला सांगते ते तर महत्त्वाचे आहेच. पण त्याहूनही महत्त्वाचे हे आहे की आपण नकारात्मक परिस्थितीत असताना या संगीताची असणारी साथ. अख्ख्या जगावर जेव्हा संकटे गुदरतात, पिढय़ा नामशेष होतात, माणसे सैरभैर होतात, तेव्हा कलाकारही जात असतील, मृत्यू होत असतील पण त्याची कला पाठी राहत असते. हजारो वर्षांपूर्वी असलेली शिल्पे घडवणारे हात केव्हाच निघून गेले. काही तोडले गेले तर काही तुटून पडले. खूप कलाकार मारले गेले. काळाच्या वरवंटय़ाखाली नष्ट होऊन गेले. पण त्यांची कला मरत नसते. ती राहिली. शोधणाऱयांनी ती शोधली आणि पुनरुज्जीवित केली. कोणत्याही गाणाऱयापेक्षा गाणे हे नेहमी मोठे असते ते यासाठीच.
संगीत किंवा कोणतीही कला ही काही मानवाची प्राथमिक गरज नव्हे किंवा नव्हती. तो श्रमपरिहार होता आणि प्रामुख्याने तो श्रमपरिहारच असतो. परंतु काळाच्या ओघात सहज एक गोष्ट लक्षात आली असावी की काही माणसे अशीही आहेत की तहानभुकेनंतर येणाऱया या गरजेच्या आराधनेत ती स्वतःची तहानभूक विसरून काम करतात. स्वतःच्या छंदाची, कलेची आराधना केल्याशिवाय त्यांना तहानभूक लागत नाही. हा मोठा विरोधाभास आहे. म्हणूनच की काय अशी माणसे भयाने ग्रासलेल्या समाजाला दिलासा देऊ शकतात. त्यांचे संगीत संपूर्ण समाजाला निराशेच्या गर्तेतून वर काढू शकते. अगदी जन्मांधालाही हे गाणे तितकाच आनंद देऊ शकते. एरवी समाजातला काही भाग अशा लोकांचा असतो की कधी वाटते दिवसरात्र हे नसते काही असले गं, त्यांच्या लेखी रात्र सदाची, ज्यांचे डोळे मिटले गं.. स्पर्श आंधळे गंध आंधळे भवताली वनराई गं हे मिटलेले डोळे घेऊनच काही माणसे जन्माला आलेली असतात. उजाडण्याची किंमत त्यांना कळावीच कशी? त्यांच्या हिशेबाने स्पर्शही आंधळेच असतात आणि गंधही. पण ‘तमातली भेसूर शांतता’ आणि उजेडात असणारी ऊब यातला फरक त्यांनाही कळतो कारण ‘कानी कूजन नाही गं’ अशी अवस्था म्हणजे डोळसांचाही अंधारच. पक्षी किलबिल करतात ते सूर्योदयापूर्वी.. उजेडाची नांदी गाणारे असते तेही संगीतच. गाणे आणि तमसो मा ज्योतिर्गमय याची अशी जोड. जेव्हा आपण चाचपडत असतो. काही शोधत असतो आणि या गाण्यासारखी आपली अवस्था असते. तीही कळवळून व्यक्त झाली आहे ती या गाण्यातून. वाट पाहतोय आपण की का नाही अजून उजाडत? रात्र तर सरत आली आहे. वाऱयांची दिशा तर बदलली आहे. मध्येच एखादी प्रकाश शलाका चमकून जाते, पण मग अंधार संपत का नाही? परत एखादी तिरीप येईल याची ओढही सरत चालली आहे. आता उरली आहे ती फक्त हुरहूर! सगळे काही वरवरचे वाटतेय, पण आतून काहीच उमलत नाही. आता हा अंधार न संपणारा आहे काय? कधी येणार उजेड? अर्धपिक्मया पहाटेला उन्हाने हात पिवळे करण्याची घाई तर आहे पण अजून उजाडतच नाही! काय करावे. याच अवस्थेत आज जग आहे. फक्त वातावरण किंचित किंचित कूस पालटू लागले आहे. आणि असे वाटू लागले आहे की खिन्न आंधळा अंधार, आता ओसरेल पार, लहरीत किरणांची, कलाबूत मोहरेल. आता उजाडेल.महामारीच्या कहरात आणि मृत्यूतांडवाच्या अंधारातच हे वर्ष सरत आहे. पण ‘अजून उजाडत नाही गं’ कडून आपल्या आशा ‘आता उजाडेल’ कडे केंद्रित करूया. नक्कीच आता उजाडेल.
अपर्णा परांजपे-प्रभु