भारताचे प्रथम सेनाप्रमुख (सीडीएस) जनरल बिपिन रावत यांच्या अपघाती मृत्यूमुळे केवळ भारतालाच नव्हे, तर जगाला धक्का बसला आहे. बुधवारी तामिळनाडूत झालेल्या या हेलिकॉप्टर दुर्घटनेत देशाने त्यांच्यासह आणखी 11 अधिकारी आणि सैनिकही गमावले. जगभरातून मान्यवरांनी या घटनेबद्दल अतिव दुःख आणि शोक व्यक्त केला आहे. रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका यांचे पार्थिव दिल्लीत आणण्यात आले असून आज शुक्रवारी अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेली दुर्घटना ज्यांनी प्रत्यक्ष पाहिली आणि या दुर्घटनेत सापडलेल्यांना साहाय्य करण्याचा प्रयत्न ज्या ग्रामस्थांनी केला, त्यांच्या बोलक्या आणि भावूक प्रतिक्रियाही येत आहेत…
‘त्यांनी पाणी मागितले, देऊ शकलो नाही…
जनरल रावत आणि इतर अधिकाऱयांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर नजीकच्या ग्रामस्थांनी त्यांना साहाय्य करण्याचा प्रयत्न केला. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलेली घटना कोणाच्याही डोळय़ांत पाणी आणणारी आहे. हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर एक खूपच जखमी आणि रक्तबंबाळ झालेली व्यक्ती दिसली म्हणून तिच्याजवळ गेलो. त्या व्यक्तीने पाणी मागितले. पण माझ्याजवळ नव्हते आणि आणून देण्याची सोयही नव्हती, म्हणून देऊ शकलो नाही. नंतर समजले की ती व्यक्ती म्हणजे जनरल बिपिन रावतच होते. ज्या अधिकाऱयाने देशासाठी इतके काही केले, त्याला शेवटच्या क्षणी पाणीही मी देऊ शकलो नाही, याचे अतीव दुःख झाले. इतके, की मी रात्रभर झोपूही शकलो नाही. हे कथन करणाऱया व्यक्तीचे नाव आहे शिवकुमार. ते कंत्राटदार असून अपघात घडला त्यावेळी त्या स्थळाच्या जवळपास होते. देशाच्या सेनाप्रमुखांना पाणीही देऊ शकलो नाही हे शल्य मनाला आयुष्यभर टोचत राहील असे असे उद्गार त्यांनी भावूक होऊन काढले.
साहाय्यासाठी अपघातग्रस्तांच्या किंकाळय़ा…
या घटनेचे आणखी एक साक्षीदार एस. दास यांनी जखमींच्या अवस्थेचे वर्णन केले. हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर त्याला त्वरित आग लागली. प्रचंड ज्वाळा उठल्या. तशातही त्यातील काही जखमी लोक साहाय्यासाठी किंकाळय़ा फोडत होते. पण आगीमुळे ताममान इतके वाढले होते की, जवळ जाणे शक्य नव्हते. नेमके काय करावे हे आम्हाला समजलेच नाही. हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर काही क्षणातच गॅस सिलिंडर फुटावा तसा मोठा स्फोट झाला. त्यामुळे आम्हीही घाबरुन गेलो. आगीच्या ज्वाळा कमी झाल्यानंतरच जवळ जाणे शक्य झाले, अशी त्यांची प्रतिक्रिया आहे.
माझ्या घराजवळच जळत होते हेलिकॉप्टर
या घटनेचा साक्षीदार शंकर याने स्थिती आणखी स्पष्ट केली. हेलिकॉप्टर कोसळले ते नेमके माझ्या घराजवळच. घरापासून काही फूट अंतरावर ते जळत होते. घरापर्यंत आगीची धग जाणवत होती. सुदैवाने माझी पत्नी आणि मुले घरात नव्हती. घटना कळल्यानंतर पोलीस तेथे पोहचले. त्यांनी त्वरित घटनास्थळापासून 500 मीटर पर्यंतच्या संपूर्ण भाग घेरला. तेथे राहणारे सोडून अन्य कोणालाही जवळ जाऊ दिले नाही. नंतर भारतीय वायु सेनेचे अधिकारी तेथे पोहचले आणि त्यांनी कोसळलेल्या हेलिकॉप्टरचे तुकडे गोळा करण्यास प्रारंभ केला.
हेलिकॉप्टर झाडांमध्ये अडकले, आग लागली…
पी, चंद्रिकाकुमार यांनीही ही घटना पाहिली होती. दुपारच्या वेळी प्रचंड मोठा आवाज झाला म्हणून तेथे धावलो, तर हेलिकॉप्टर पडलेले दिसले. प्रथम ते झाडांमध्ये अडकलेले होते. तेथेच त्याला आग लागली. नंतर ते जमिनीवर पडले. हेलिकॉप्टरमधून काही लोकांचे जळणारे देह बाहेर पडले तर काही लोक साहाय्यासाठी किंकाळय़ा फोडत होते, असे मनाला पाझर फोडणारे वर्णन या साक्षीदाराने केले. साहाय्य करणे शक्य नव्हते, असेही त्याने स्पष्ट केले. ही भयानक घटना विसरु शकणार नाही, असे उद्गार त्याने काढले.
इंटिग्रेटेड थिएटर कमांड, म्हणजे काय ?
सेनेत इंडिग्रेटेड थिएटर कमांडचे महत्व अनन्यसाधारण आहे. सर्वसामान्यांना याचा अर्थ फारसा कळत नाही. त्यामुळे या संज्ञेचा अर्थही निवृत्त कर्नल पिल्लई यांनी स्पष्ट केला. भूसेना, वायुसेना आणि नौसेना यांचे प्रमुख अधिकारी भिन्न असतात. त्यांची प्रत्येकाची स्वतःची विशिष्ट योजना असते, ध्येये असतात आणि रोडमॅप्स असतात. प्रत्येकाची कार्यशैली भिन्न असू शकते. अशावेळी तीन्ही सेनादलांमध्ये आवश्यक तो समन्वय कित्येकदा रहात नाही. त्यामुळे आणिबाणीच्या प्रसंगी समस्या येऊ शकतात. तसे होऊ नये म्हणून या कमांडची स्थापना करण्यात आली आहे. यासाठी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ किंवा सीडीएस किंवा सेनाप्रमुख पदाची निर्मिती करण्यात आली आहे. ज्या प्रमाणे चित्रपटात प्रत्येक अभिनयपटू दुसऱया अभिनयपटूशी सहकार्य करत त्याला समजून घेत आपल्या दिलेली भूमिका करतो, तसे तिन्ही सेनादलांना करावे लागते. अभिनेत्यांमध्ये समन्वय साधण्याचे काम ज्याप्रमाणे चित्रपटाचा दिग्दर्शक करतो, तसे हे उत्तरदायित्व सीडीएसकडे आहे. म्हणून याला थिएटर असे म्हणतात, अशी माहिती त्यांनी दिली.
केवळ चालक आहे जिवंत…
या दुर्घटनेत केवळ या हेलिकॉप्टरचे चालक ग्रुप कॅप्टन वरुणसिंग हे जिवंत राहिले आहेत. त्यांच्यावर उपचार होत आहेत. सध्या त्यांची नियुक्ती तामिळनाडूतील वेलिंग्टन येथे करण्यात आली आहे. तेथेच ते आपली पत्नी, एक पुत्र आणि एक कन्या यांच्यासह वास्तव्यास आहेत. त्यांचे पिता कर्नल के. पी. सिंग हे आहेत. तर त्यांचे बंधू तनुज सिंग नौदलात आहेत. वरुण प्रताप सिंग हे काँगेसचे रुद्रपूरचे माजी आमदार व प्रवक्ते अखिलेश सिंग यांचे पुतणे आहेत.
मान्यवरांच्या प्रतिक्रिया…
अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अँटोनी ब्लिंकन-
भारताचे सेनाप्रमुख जनरल बिपिन रावत यांच्या निधनामुळे मी अत्यंत व्यथित आहे. ते, त्यांच्या पत्नी आणि इतर अधिकारी यांच्या मृत्यूच्या दुःखात मी सहभागी आहे. जनरल रावत आमच्या सदैव स्मरणात राहतील. ते एक महान सेनानी आणि नेता होते.
अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन
जनरल रावत महान द्रष्टे होते. त्यांनी भारत आणि अमेरिका यांच्या सामरिक सहकार्याला नेहमीच प्रोत्साहन दिले. भारत-अमेरिका सामरिक भागीदारीचे ते समर्थक होते. या भागीदारीत त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांना मी आदरपूर्वक श्रद्धांजली वाहतो.
संयुक्त राष्ट्रसंघ महासचिव अँटोनिओ गुटरेस
जनरल रावत यांचे निधन ही अत्यंत दुःखद घटना आहे. ते आणि त्यांच्यासह निधन पावलेल्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. जनरल रावत यांनी संयुक्त राष्ट्रसंघालाही सेवा दिली आहे. त्यांच्या योगादानाचे आम्ही आजही आदरपूर्वक स्मरण करतो.
इस्रायलचे पंतप्रधान नाफ्ताली बेनेट
जनरल बिपिन रावत हे इस्रायलचे खरे मित्र होते. तसे सच्चे नेते होते. त्यांच्या निधनामुळे भारताच्या जनतेला धक्का बसला आहे. ते आणि त्यांच्यासह मृत्युमुखी पडलेल्या अधिकाऱयांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. भारताला हा धक्का सहन करण्याचे बळ मिळो.
हेलिकॉप्टर अपघातासंबंधी 4 महत्वाचे प्रश्न…
ही भीषण दुर्घटना का आणि कशी घडली, हे प्रश्न ज्याच्या त्याच्या मनात आहेतच. याशिवाय तज्ञांकडून आणखी काही महत्वाचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यांची उत्तरे मिळाल्यास अपघाताचे खरे कारण समजू शकते.
प्रश्न 1- ही दुर्घटना खराब हवामानामुळे घडली आहे काय ?
एमआय-17 व्ही 5 या हेलिकॉप्टरची दुर्घटना खराब हवामानामुळे घडल्याचे प्रथमदर्शनी वाटत आहे. आतापर्यंत तरी हेच कारण देण्यात आले आहे. पूर्वीही खराब हवामानामुळे असे अपघात घडले आहेत. विशेषतः डोंगराळ आणि वनमय भागांमध्ये असे घडू शकते. यावेळीही असेच घडले असल्याचे दिसते.
प्रश्न 2- हा अपघात तांत्रिक दोषामुळे झाला काय ?
हे हेलिकॉप्टर अत्यंत सुरक्षित मानले जाते. त्यात तांत्रिक दोष निर्माण होण्याची शक्यता जवळपास नाही. त्यामुळे जगातील मान्यवर आणि उच्चपदस्थ याचा उपयोग करतात. हे दुहेरी इंजिनाचे हेलिकॉप्टर आहे. एक इंजिन खराब झाल्यास दुसरे असते. त्यामुळे ही शक्यता जवळपास नाहीत जमा आहे.
प्रश्न 3- हेलिकॉप्टर वीजेच्या तारेला अडकून पडले काय ?
ही शक्यता पूर्णतः फेटाळण्यात आलेली नाही. ज्या स्थानी जनरल रावत जाणार होते ते वेलिंग्टन आर्म्ड फोर्सेस कॉलेज अपघात स्थळापासून केवळ 10 किलोमीटरवर आहे. हेलिपॅड जवळ आल्यानंतर हेलिकॉप्टर कमी उंचीवर आणण्यात येते. अशावेळी वीजेची तार जवळ असेल तर तसे घडू शकते. त्यामुळे हे हेलिकॉप्टर नेमके किती उंचीवर उडत होते हे शोधणे महत्वाचे आहे.
प्रश्न 4- चालकाच्या चुकीमुळे हा अपघात झाला काय ?
ही शक्यता दुरापास्त आहे. कारण हे हेलिकॉप्टर सर्वोत्तम गुणवत्तेचे असल्याने ते चालविणारा चालकही अतिशय कुशल असतो. कोणत्याही परिस्थितीत हेलिकॉप्टर सुरक्षित कसे राखायचे याची त्याला पूर्ण माहिती असते. सेनाप्रमुख असलेले हेलिकॉप्टर अननुभवी चालकाच्या हाती कधीच दिले जात
नाही.