परवाना बंद करून कर्नाटकात नागरिकांना पाठवू नका असे शासनाचे आदेश
कोल्हापूर/ प्रतिनिधी
कोल्हापूर – कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे कर्नाटक सरकारने देशातील इतर राज्यांमधून कर्नाटकामध्ये येणाऱ्या नागरिकांना बंदी केली आहे. यासाठी तर राज्यातून कर्नाटकात परतणार्या नागरिकांसाठी ऑनलाईन पासची सुविधा त्यांनी बंद केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या नागरिकांना सीमेवरच रोखल्याने हे नागरिक कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येण्याचा धोका निर्माण झाला आहे. परिणामी पोलिसांवरील ताण आणखीनच वाढणार आहे.
उद्योग व्यवसायानिमित्त आपले गाव, राज्य सोडून परराज्यात स्थिरावलेल्या नागरिकांना आता आपल्या गावचे वेध लागले आहेत. उपासमारीने जीव जाण्यापेक्षा आपल्या गावीच काय व्हायचे ते होऊदे असा विचार करून मिळेल त्या वाहनाने ते गावाकडे परतत आहेत. मात्र आता काही राज्यांमध्ये कोरोना संसर्गाचा धोका वाढत असल्यामुळे ऑनलाइन परवाने बंद करण्याकडे त्या राज्यांचा कल आहे. अशातच कर्नाटक राज्याने कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांच्या संख्येचा विचार करता परराज्यातून येणाऱ्या नागरिकांना परवाने देऊ नयेत अशा सूचना केल्या आहेत.
तत्पूर्वी अनेक जण एसटी बसेस, खाजगी वाहने त्याच बरोबर चालत कर्नाटक राज्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांना राज्याच्या सीमेवरच रोखण्यात आले आहे. परवाना नसल्यामुळे त्यांना कोगनोळी टोलनाक्यावर अडवून धरले आहे. कर्नाटक राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी सीमेवरील पोलीस अधीक्षक तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून कोणालाही कर्नाटकामध्ये पाठवू नका अशा सूचना केल्या आहेत. त्यामुळे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी किनी टोलनाक्यावर बंदोबस्त वाढवला आहे.
तसेच कोगनोळी टोल नाक्यावर प्रचंड मोठ्या संख्येने नागरिक थांबून असल्यामुळे ते कोल्हापूर जिल्ह्यात कोणत्या ना कोणत्या मार्गाने शिरण्याचा धोका वाढला आहे. अशा सर्वच नागरिकांवर लक्ष ठेवणे आणि त्यांना जिल्ह्यात प्रवेश करू न देणे हे एक पोलिसांसमोर आव्हान आहे. त्यामुळे पोलिस अधीक्षक डॉ. देशमुख यांच्या आदेशाने कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवर पुन्हा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.