जिल्हाधिकाऱयांनी केल्या अधिकाऱयांना सूचना, ऑक्सिजन प्लांट मालकांचीही घेतली बैठक : बिम्समधील तणाव दूर करणार
प्रतिनिधी / बेळगाव
लोकसभा निवडणूक व मतदान काळात 2 हजाराहून अधिक कर्मचाऱयांनी निवडणुकीच्या प्रक्रियेत काम केले आहे. त्यामधील 10 टक्के लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. मात्र आता निवडणुकीचे संपूर्ण काम पूर्ण झाले असल्यामुळे कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी लक्ष केंद्रित केले जाईल, असे जिल्हाधिकारी डॉ. हरिषकुमार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत सांगितले.
कोविड संसर्ग वाढला आहे. त्यावर नियंत्रण मिळविणे महत्त्वाचे आहे. बिम्समधील चाललेला सावळा गोंधळ दूर करण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. त्यामुळे निश्चितच कोरोना रुग्णांचा आकडा कमी होईल. जिल्हय़ातील खासदार तसेच आमदारांनी याबाबत जिल्हाधिकाऱयांसमोर विविध सूचना मांडल्या आहेत. बेळगाव जिल्हा हा गोवा आणि महाराष्ट्र सीमेवर वसला आहे. त्यामुळे अधिक दक्षता घेणे गरजेचे आहे. बिम्सबद्दल तक्रारी वाढल्या आहेत. तेथील कार्यपद्धतीमध्ये सुधारणा होणे ही काळाची गरज आहे. डॉक्टरांचा तुटवडा आहे. तेव्हा नवीन डॉक्टरांची नेमणूक करणे महत्त्वाचे आहे. बिम्समधील तणाव कमी करण्यासाठी चांगल्या अधिकाऱयांची याचबरोबर 100 वैद्यकीय प्रशिक्षित डॉक्टरांची आणि परिचारिकांची नियुक्ती करा, असे यावेळी जिल्हाधिकाऱयांना सांगण्यात आले.
रविवारी झालेल्या मतमोजणीनंतर सोमवारी तातडीने बैठक घेवून कोरोनाबाबत दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी शशिकांत मुन्याळ यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. आमदार अनिल बेनके यांनी यावेळी अधिकाऱयांना विविध सूचना केल्या.
ऑक्सिजन प्लांट मालकांची बैठक
शहरासह जिल्हय़ातील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची कमतरता लक्षात घेवून जिल्हाधिकारी डॉ. के. हरिषकुमार यांनी ऑक्सिजन प्लांट मालकांची आणि प्रतिनिधींची बैठक घेतली आहे. ऑक्सिजनची कमतरता दूर करण्याबाबत पाऊल उचलावे, अशी सूचना त्यांनी यावेळी केली आहे.
चामराजनगर जिल्हय़ात ऑक्सिजन नसल्याने 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही घटना अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे येथील ऑक्सिजन प्लांट मालकांची तातडीने बैठक घेतल्याचे जिल्हाधिकाऱयांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. खासगी रुग्णालयातील 50 टक्के बेड आरक्षित करण्याचा सल्ला यापूर्वीच दिला आहे. त्या ठिकाणी ऑक्सिजन पुरवठा करण्याची व्यवस्था करू, असेही त्यांनी सांगितले. बिम्समधील गोंधळ थांबविण्यासाठी पोलीस आयुक्तांना कारवाईबाबत सर्व अधिकार दिले असून यापुढे ते तेथील पाहणी करुन संबंधित अधिकाऱयांना सूचना करतील, असे त्यांनी यावेळी सांगितले. काही ठिकाणी गंभीर असलेल्या रुग्णांना बेड मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे त्या ठिकाणी बेड मिळावेत, यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.