ठाकरे यांचे आवाहन, रत्नागिरीत विषाणू प्रयोगशाळेचे ई-लोकापर्ण , वैद्यकीय महाविदयालयासाठीही अनुकूलता
प्रतिनिधी/रत्नागिरी
विषाणू प्रयोगशाळेच्या निर्मितीमुळे रत्नागिरीत आरोग्यविषयक मुलभुत सुविधा बळकट झाली आहे. या प्रयोगशाळेमुळे कोरोना चाचण्यांची गती वाढून त्वरीत उपचार उपलब्ध होणार असल्याने रत्नागिरीकरांना मोठा फायदा होणार आहे. आता आपली खरी परीक्षा असून जिल्हय़ात रूग्ण संख्या वाढू नये यासाठी प्रत्येकाने खबरदारी घेतली पाहिजे असे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले आहे. रत्नागिरीतील वैद्यकिय सुविधांबाबतही तोडगा काढण्याचे आश्वासन देतानाच जिल्हय़ात वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेला मुख्यमंत्र्यांनी अनुकुलता दर्शवली.
जिल्हा शासकीय रूग्णालयात 1 कोटी 7 लाख रूपये खर्चाच विषाणू प्रयोगशाळेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंगळवारी ई-लोकार्पण झाले. मंजुरी मिळाल्यानंतर अवघ्या 14 दिवसांमध्ये ही प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. याचा बांधकामासाठी 15 लाख तर यंत्रसामुग्रीसाठी 80 लाख खर्च झाला आहे. अत्यंत कमी कालावधीत अतीशय गतीमान पद्धतीने प्रयोगशाळा उभारल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाचे अभिनंदन केले.
व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे झालेल्या या कार्यक्रमात मुंबईत मुख्यमंत्र्यांसोबत आरोग्य मंत्री राजेश टोपे, पालकमंत्री अनिल परब, प्रधान सचिव प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये सचिव डॉ. संजय मुखर्जी आदी उपस्थित होते. तर रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा, जि. प. अध्यक्ष रोहन बने, आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम, आमदार राजन साळवी, जि. प. सीईओ बघाटे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक बोल्डे, पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे आदी उपस्थित होते.
पूर्वी राज्यात दोनच कोविड टेस्ट लॅब होत्या मात्र दिवसेंदिवस वाढती रूग्ण संख्या पाहता त्याची संख्या वाढविण्यात आली असून सध्या 87 लॅब राज्यात कार्यान्वित आहेत. लॅब सुरू करण्याचा हेतू हा लवकर निदान व्हावे हा आहे. त्यामुळे आता खरी परीक्षा असून रूग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येकाने खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कोरोनामुळे समाजात भीती निर्माण केली असली तरी काही चांगल्या गोष्टी शिकवल्या. घरपण काय असते ते कोरोनामुळे अनुभवयाला मिळाले असेही त्यांनी सांगितले.
कोकण व ठाकरे यांचे अतूट नाते
कोकणाने ठाकरे कुटुंबाला नेहमीच खूप प्रेम दिले आहे. त्यामुळे कोकण आणि ठाकरे कुटुंबाचे जवळचे नाते असल्याचेही त्यांनी सांगितले. आपले आजोबा संयुक्त महाराष्ट्र चवळीत अग्रणी होता तर आज मी मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रासाठी काम करत आहे.
आरोग्य विभागात विशेष भर्ती
कोकण हे अतिशय सुंदर ठिकाण आहे. मात्र अधिकारी तेथे का जात नाही हा मोठा प्रश्न आहे. जिल्हय़ाती वैद्यकीय समस्या मागी लावण्यासाठी आरोग्य विभागाची विशेष भरती करू अशी ग्वाही आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. रूग्ण संख्या आणखीन जास्त वाढू नये यासाठी प्रयत्न करूया, असेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांचे आभार : राऊत
सरकारी खाते म्हणजे फाईल दाबून ठेवणारे अशी प्रतिमा पूर्वी होती आताच्या सरकारने ही प्रतिमा फुसून काढली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी 24 तासात रत्नागिरीच्या कोरोनासंदर्भात परिपत्रक काढले आणि 14 दिवसात ही यंत्रणा उभी करण्यात आली त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे कोकणवासियांकडून आभार मानत असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावना करताना लॅबची माहिती दिली. लॅब शुभारंभानंतर माहिती कार्यालयातर्फे प्रयोगशाळेच्या कामकाजाबाबत वृत्तपट दाखविण्यात आला. या कार्यक्रमाचे फेसबुकवर थेट प्रसारणही झाल्याने रत्नागिरीकरांना हा कार्यक्रम पाहता आला. मुख्यकार्यकारी अधिकारी कान्हुराज बघाटे यांनी आभार मानले.
रत्नागिरी, सिंधुदुर्गत मेडिकल कॉलेज गरजेचे-उदय सामंत
प्रयोगशाळा शुभारंभ प्रसंगी मंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासमोर रत्नागिरी-सिंधुदूर्ग जिल्हय़ातील वैद्यकीय समस्या व कमतरतांबाबतची वस्तुस्थिती मांडली. दोन्ही जिल्हय़ात वैद्यकीय महाविद्यालय होण्याची आवश्यकता त्यांनी सांगितले. याला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत वैद्यकीय महाविद्यालयासाठीचा प्रस्ताव पाठवा, त्यावरही कार्यवाही होईल असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्हय़ातील मेडीकल कॉलेजचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे.
लॅबमध्ये कॅन्सर, टीबी, एचआयव्हीचे निदान होणार
रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालयात उभारण्यात आलेल्या विषाणू प्रयोगशाळेचा कोरोना टेस्टचा चांगला उपयोग होईलच. मात्र, केवळ कोविडच नव्हे तर कॅन्सर, टीबी, एचआयव्ही टेस्ट सुध्दा करता येणार आहेत. त्यामुळे कोराना संपुष्टात आल्यावरही रत्नागिरीकरांना याचा चांगला उपयोग होणार आहे. जालना व रत्नागिरीच्या प्रयोगशाळा एकाच दिवशी मंजुर झाल्या. मात्र रत्नागिरीत विक्रमी वेळेत त्याची उभारणी झाल्याचेही आरोग्य मंत्री टोपे यांनी सांगितले.